Emerging Business Conclave : एकीकडे मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धामधुम सुरु असतानाच मराठा आरक्षणाचे वादळ पुन्हा एकदा राजधानीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईत येणार असून आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार आहेत. गणपती उत्सवाच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याने सरकारपुढे ही कोंडी सोडवण्याचे मोठं आव्हान आहे. याबाबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
"काही गोष्टी संयमाने केल्या पाहिजेत, असं माझे मत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या साथीने १० टक्के मराठा आरक्षण दिलं आहे. सारथीमध्ये किंवा अन्य महामंडळांमध्ये मराठा समाजाच्या मुलांना कसे न्याय देता येईल. याबाबत सरकारची भूमिका आहे. मराठी समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, ही देखील सरकारची भूमिका आहे, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
"पहिल्यांदा जे आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते सरकारमध्ये टिकले, हायकोर्टात टिकले पण नंतर सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण निघून गेले. याला दोषी कोण? याचाही अभ्यास मनोज जरांगेंनी केला पाहिजे. सरकारसोबत त्यांनी चर्चा केली पाहिजे. हे करत असताना ओबीसीवरदेखील अन्याय झाला नाही पाहिजे, त्यांचे आरक्षण कमी होता कामा नये, अशीही सरकारची भूमिका आहे," असंही ते म्हणाले.
मनोज जरांगेंना आवाहन!
दरम्यान, "गणपतीचा फार मोठा उत्सव आहे. मुंबईमध्ये तो फारमोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याच्यामुळे कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही. याची काळजी घेऊन सामंजसपणे पाऊले टाकली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
नक्की वाचा - Emerging Business Conclave : 'तुम्ही काय केलं, ठाकरे बंधूंना सवाल'; शेलारांनी 1995 पासून कामाचा पाढाच वाचला