
Emerging Business Conclave Mumbai Chapter : महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि मराठी भाषेबाबत आपली भूमिका मांडली.
मुंबई गोवा महामार्गाला खड्डे पडले हे चुकीचे आहे. मुंबई गोवा महामार्गावरील 27 किलोमीटरवर खड्डे आहेत. एकूण रत्नागिरीपर्यंतचा प्रवास 354 किलोमीटर आहे. यापैकी फक्त 27 किलोमीटरवर खड्डे आहेत. पुढच्या गणपतीमध्ये अशी स्थिती येणार नाही, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा - Emerging Business Conclave : 'तुम्ही काय केलं, ठाकरे बंधूंना सवाल'; शेलारांनी 1995 पासून कामाचा पाढाच वाचला
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी (Marathi vs Amarathi) असा वाद सुरू आहे. याची परिणीती मारहाणीत होत आहे. अनेक ठिकाणी मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरुन अमराठींना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत उदय सामंत यांना प्रश्न करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती करुन आता मराठीचे गुणगाण गाणे चुकीचे आहे. 'म' मराठीचा राहिलेला नाही, 'म' आता महापालिकेचा आणि मतांचा झाला आहे. मराठी भाषा येत नसेल तर शिकावी.
पुढील दोन महिन्यात आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलता यायला हवं. महिनाभरात पहिल्या पाच हजार अमराठी लोकांसाठी एक अॅप तयार करतोय. त्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत मराठी शिकवणी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी यायला हवी अशी आमची इच्छा आहे. मात्र त्यावर कानशिलात लगावणं हा उपाय नाही. त्यापेक्षा आपण अॅप तयार करू. जर त्याने शिकायला नकार दिला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषा शिकविण्यासाठी मारहाण करणं योग्य नाही. त्याऐवजी आम्ही अॅप तयार करतोय. मात्र अमराठी लोकांनी वेळ काढून या अॅपच्या (Marathi learning app) साहाय्याने मराठी भाषा शिकायला हवी. शिकायला नकार दिला त्यावर मात्र कायदेशीर बाबी तयार असल्याचं उदय सामंत यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world