NDTV Marathi Emerging Business Conclave: विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. आयटी सेक्टर, मेट्रोचे जाळे, नवीन इंडस्ट्रीज यामुळे पुणे शहराला नवी आणि वेगळी ओळख मिळत आहे. एकीकडे पुण्याचा विकास होत असतानाच अनेक मुलभूत समस्याही भेडसावत आहेत. या समस्यांवर मात करत राज्याच्या आर्थिक प्रगतीत पुणे शहर कसं योगदान देईल? महत्त्वाचं म्हणजे पुण्याची वाहतूक कोंडी, पावसामुळे होणारी तुंबई आणि सुरक्षेचा प्रश्न कसा सोडवता येईल. याबाबत एनडीटीव्ही मराठीच्या बिझनेस कॉनक्लेव्हमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
Pune : पुण्याहून लवकरच युरोपात विमानानं जाता येणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
पुण्याच्या वाहतूक कोंडीवर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
'प्रश्न उपस्थित करत असताना त्याची पार्श्वभूमीही मांडायला पाहिजे. मी 82 ला पुण्यात आलो, जरी मला पुण्याच्या बाहेरचे म्हणत असले तरी. तेव्हापासूनचे पुणे मला माहित आहे. मुलगी गाडी चालवायच्या, मी टकाटका बघत बसायचो. तेव्हापासूनचे 10 लाख लोकसंख्येवाले पुणे मी बघतो. आता त्याची लोकसंख्या 72 लाख झाली आहे. या दिवाळीत एकादिवशी 18 हजार वाहने नोंद झाली आहेत. अशावेळी आता आकाशातून वाहने चालवायची का? मुंबईप्रमाणे इथे लोकल नाही. आता मेट्रो आली. जेवढ्या पर्यायी व्यवस्था उभ्या करता येतील त्या निर्माण कराव्या लागतील. मेट्रोचे नव्याने मंजूर काम पूर्ण झाल्यानंतर 8 लाख लोक त्याने प्रवास करतील. पण तोपर्यंत लोकसंख्या कोटींकडे गेलेली असेल, असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच "मे महिन्यात एवढा पाऊस कधी पडला होता का? पावसाचे प्रमाण वाढले. दुबई सारखे शहरही पाण्याखाली गेले. त्या त्या शहरातल्या रस्त्यांची किती वाहने जाणार? पावसानंतर किती पाणी जाणार याची व्यवस्था असलेत. पुणे शहराला पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या लाईन्स नाहीत. काही ठिकाणी आहेत मात्र प्रचंड पावसामुळे त्या पुरत नाहीत. पुण्यात आठ दिवस पाणी साठून राहते असं घडते का? जास्त पाऊस पडला की तो वाहून जाऊ शकत नाही. पुण्यामध्ये बिल्डर्सने नाले खाल्ले त्याचाही हा परिणाम आहे," असंही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
मंत्री माधुरी मिसाळ काय म्हणाल्या?
"2005 पासून पुणे शहर वेगाने बदलत गेले. पुण्यामध्ये आयटी सेंटर व्हायला लागले. एज्युकेशन हब झाल्यामुळे लोकांचा ओढा वाढला. मात्र शहराचा विस्तार झाला नाही. रस्ते, कचऱ्याची व्यवस्था, रुग्णालये, आपत्तीव्यवस्थापन या सोई पुरवण्याचा वेग कमी राहिला, असं माझे मत आहे. कुणाच्याही हातात जादूची कांडी नसते. पाठीमागे 50 वर्षाच्या गोष्टी चुकीच्या होतात त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे," असं म्हणत माधुरी मिसाळ यांनी पुण्यातील वाहतूक कोंंडी, पाणीप्रश्नावरुन महत्त्वाचं विधान केले.
पुणे सुरक्षित शहर: रुपाली चाकणकर
"पुण्याची वाढ ज्या पद्धतीने होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कोणालाही नोकरी, व्यवसाय शिक्षण घ्यावं असं वाटणारे शहर म्हणजे पुणे. विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा चांगला विकास झाला. पुण्यानेही इथे येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेतलं. शिक्षणाच्या दृष्टीने असो किंवा सुरक्षेच्या दृष्टीने पुणे हे अत्यंत सुरक्षित शहर आहे," असं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
"बोपदेव घाटात जी घटना घडली त्याठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही नव्हते. ती घटना घाटाच्या अंधाऱ्या भागामध्ये घडली. यामधल्या तिनही आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणताही पुरावा नसताना 700 पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध घेतला. आणि ते सर्व परराज्यातील आहेत. पुण्यामध्ये इतर राज्यातून किंवा बाहेरुन जेव्हा व्यक्ती येतात तेव्हा त्यांची पोलीस ठाण्यात नोंद असावी, त्यांची पार्श्वभूमी माहिती असावी. स्वारगेटची घटना, बोपदेवची घटना या सर्वांमधील आरोपी हे बाहेरचे आहेत," असंही त्या म्हणाल्या.