मनोज सातवी, पालघर:
Palghar News: एकीकडे राज्यभर कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बेदुमत संप पुकारला असताना पालघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या धडक कारवाईनेगैरप्रकार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
कृषी सेवा केंद्रांविरोधात मोठी कारवाई
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जादा दराने विक्री, साठेबाजी, खतासोबत इतर साहित्य खरेदीची सक्ती, साठा रजिस्टर न ठेवणे अशा अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात आठ तालुक्यांत एकूण २०९ कृषी सेवा केंद्रे असून खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे, खते आणि औषधांच्या खरेदीला लागले आहेत. याच काळात गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने धडक मोहीम राबवली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, गैर प्रकार करणाऱ्या इतर कृषी सेवा केंद्रांनचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.
राज्यव्यापी बंदला मोठा प्रतिसाद
दरम्यान, राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाईड्स सीड्स डिलर्स असोसिएशनने आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत बंद आंदोलनाचा कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नाशिकच्या चांदवडलाही कृषी निविष्ठा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे.त्यामुळे चांदवडमधील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची दुकाने कडकडीत बंद आहेत.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद सुरूच ठेवण्याचा निर्धार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केला आहे.