मनोज सातवी, पालघर: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी रॉडला गळफास घेऊन पल्लवी खोटरे या विद्यार्थिनीने आयुष्य संपवले. शाळा सुरु होऊन 15 दिवस उलटत नाहीत तोच विद्यार्थिनीने आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आश्रम शाळेत 175 विद्यार्थिनी असून केवळ एकच महिला शिक्षिका असल्याचंही समोर आले आहे.
Pune : पुण्याहून लवकरच युरोपात विमानानं जाता येणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रमशाळेत पल्लवी खोटरे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पल्लवीने वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी रॉडला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
शाळा सुरु होऊन 15 दिवस उलटत नाहीत तोच विध्यार्थिनीची आत्महत्या केल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवविचेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आश्रम शाळेत 175 पेक्षा जास्त विध्यार्थिनी, असूनही केवळ एकच महिला अधिक्षिका आहे. तर सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी हे पुरुष असल्याने विध्यार्थिनींची अडचण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पल्लवीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.