संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Pandharpur Couple Death: एकीकडे वटपोर्णिमेचा सण उत्साहात साजरा होत असतानाच पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५) अशी या दुर्दैवी दांपत्याची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण आंबे गावात शोककळा पसरली आहे.
Pune Nasarapur Case: ब्रेकिंग! नसरापूरच्या नराधमाला फाशी; 2 महिन्यात न्याय मिळाला
पतीला वाचवायला पत्नी धावली, दोघांचाही जीव गेला
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी पाऊस सुरू असताना लक्ष्मण नागणे हे आपल्या शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी ओल्या जमिनीत वीज प्रवाह उतरल्यामुळे त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. पतीला अशा अवस्थेत पाहून त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी अलका नागणे धावल्या. मात्र, पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा धक्का लागला आणि काही क्षणांतच या दांपत्याचा दुर्दैवी अंत झाला.
वटपौर्णिमेचा सण साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. सध्या महावितरण आणि स्थानिक पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास केला जात आहे. आज वटपोर्णिमेच्या दिवशी विवाहिता आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, अशातच या पवित्र दिवशीच पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.