Ahilyanagar News: श्रीरामपुरात प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू,नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरविरोधात ठिय्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात प्रसूतीदरम्यान 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर आणला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Women Dies After Delivery In Shrirampur

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

Ahilyanagar Crime Update :  अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात प्रसूतीदरम्यान 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर आणला आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.दरम्यान,नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असून लोणी येथील प्रवरा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण समोर

श्रीरामपूर शहरातील मैड हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 22 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली.शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण श्वासनलिकेत अन्न अडकल्याने झाल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.जर श्वासनलिकेत अन्न अडकले होते,तर ते वेळेत का काढण्यात आले नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Advertisement

"निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा"

तसेच महिलेची प्रकृती बिघडू लागल्यानंतर डॉक्टरांनी इतर रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर पाठवले होते.काही वेळानंतर इतर डॉक्टरांना बोलावण्यात आले.मात्र त्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.डॉक्टरांनी मृत्यूबाबत वेगवेगळी कारणे सांगितली,असा आरोप करण्यात आला.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत डॉक्टरांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान,अशा प्रकारच्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये सिव्हिल सर्जन यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करता येते,असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.आता सिव्हिल सर्जनच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यानंतरच या प्रकरणातील पुढील दिशा निश्चित होणार आहे.