अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Crime: पुण्यामधून खंडणी आणि अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील टिंबर मार्केट येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ गुन्हेगारांना गुन्हे शाखा यूनिट 2 कडील पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
व्यापाऱ्याचे अपहरण, दीड कोटींची मागणी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयेश ओसवाल यांचे टिंबर मार्केटमध्ये दुकान आहे. ते २३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते; मात्र रात्री ते घरी परतले नाहीत. मध्यरात्री १ वाजता त्यांच्या पत्नीला व्हॉट्सअॅप कॉल आला. अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने मला सोबत नेले असून मला डांबून ठेवले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. १ कोटी ५० लाख रुपये तयार ठेव, मी तुला दोन तासांनी परत फोन करतो, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर फोन बंद झाला. या घटनेने घाबरलेल्या प्रांजल ओसवाल यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्वारगेट पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी जयेश ओसवाल यांना घेऊन नसरापूर येथे गेल्याचे समजले.
5 जण अटकेत
त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून अपहरण करणाऱ्या ५ जणांना पकडले आणि जयेश ओसवाल यांची सुटका केली. व्यवसायातील व्यवहारावरून हे अपहरण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सौरभ विश्वनाथ पवार (वय २७, रा. बावधन ), शिरीष खोपडे (वय २६, रा. आंबेगाव), मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, रा.वडगाव), साहिल श्रीकांत खुटवड (रा. भिलारेवाडी) आणि प्रणव बबन निवगुणे (वय २३, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम पुढील तपास करीत आहेत.