सुरज कसबे, मावळ
Visapur Fort: सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या दऱ्या-खोऱ्यांत वसलेला पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका म्हणजे मावळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया याच भूमीत रचला गेला होता आणि येथील 'मावळ्यांनी' स्वराज्याच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले होते. आता याच मावळच्या भूमीत एक अनमोल खजिना सापडला आहे.
मावळात सापडले गूढ भुयार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मावळच्या ऐतिहासिक भूमीत पुन्हा एकदा इतिहासाचा एक रहस्यमय ठेवा समोर आला आहे. विसापूर गडाच्या एका दुर्गम आडवाटेवर एक प्राचीन आणि अपरिचित भुयार आढळल्याने दुर्गप्रेमी आणि इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना मालेवाडी परिसरातून आडवाटेने विसापूर गड चढत असताना उभ्या कातळात कोरलेले हे भुयार अचानक सापडले.
हे भुयार पूर्णपणे मानवनिर्मित असून, त्याच्या भिंतींवर छिन्नी आणि हातोड्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. साधारण ३ बाय ३ फूट आकारमान असलेले हे भुयार सुमारे ५० फूट लांब असून, सुरुवातीला सरळ गेल्यानंतर ते पुढे खोल होत डाव्या-उजव्या बाजूने वळण घेते. सध्या यात पाणी आणि चिखल साचलेला आहे.
या शोधाबाबत इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी सांगितले की, लोहगड, विसापूर आणि तुंग गड परिसरात पूर्व मध्ययुगात अशी भुयारे खोदण्यात आल्याचे संकेत मिळतात. या भुयाराचा उपयोग प्रामुख्याने ध्यानधारणा किंवा साधनेसाठी होत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या अनोख्या शोधामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात एका गूढ अध्यायाची भर पडली असून, या ऐतिहासिक भुयारावर आता सखोल संशोधन होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
HSRP Deadline: 30 जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट न बसवल्यास काय कारवाई होणार?