Varandha Ghat Closed: पुण्यावरुन कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा 'वरंध घाट' रस्ता पुढील सव्वा महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि मजबुतीकरणाचे काम अत्यंत कठीण टप्प्यावर असून सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासन हा मार्ग दोन महिन्यांसाठी बंद ठेवणार आहे.
वरंधा घाट दोन महिन्यांसाठी बंद
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे आणि कोकणला जोडणारा अत्यंत निसर्गरम्य मात्र तितकाच धोकादायक मानला जाणारा 'वरंधा घाट' लवकरच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाण्याची शक्यता आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि मजबुतीकरणाचे काम अत्यंत कठीण टप्प्यावर असून, सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासन हा मार्ग दोन महिन्यांसाठी बंद ठेवला जाणार आहे.
सध्या हिर्डोशीच्या पुढील भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे, कारण एका बाजूला नीरा-देवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगररांगा आहेत. अशा अरुंद पट्ट्यात अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवणे हे प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळेच हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी पावसाळा लक्षात घेता, घाटातील अवघड कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना ताम्हिणी घाट किंवा महाबळेश्वरमार्गे कोकणात जावे लागेल. यामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्हीमध्ये वाढ होणार असली, तरी भविष्यातील सुरक्षित प्रवासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
IAS Transferred: राज्यात बदल्यांचा धडाका! 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल
या पर्यायी मार्गांचा वापर करा!
हा रस्ता बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग दिले आहेत. यामध्ये पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव- निजामपूर- ताम्हिणी घाट- मुळशी- पिरंगुट ते पुणे असा प्रवास करता येईल तर कोल्हापूर तसेच साताऱ्याकडे जाण्यासाठी पोलादपूर, महाबळेश्वर, वाई- सातारा किंवा पोलादपूर- खेड- चिपळूण- पाटण मार्गाचा वापर करावा लागणार आहे.