सुरज कसबे, प्रतिनिधी:
Pimpri Chinchwad Air Pollution News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वायुप्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता अतिखराब झाली आहे. विशेषत हिंजवडी आणि वाकड परिसरात सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्प असल्याने येथील हवा सर्वाधिक खराब नोंदवण्यात आली आहे. दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीने हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे. अशुद्ध हवामानामुळे पिंपरी-चिंचवड आता सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये आले आहे.
पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये हवा बिघडली!
समोर आलेल्या माहितीनुसार, दिवाळी सुरू होण्यापूर्वीच वाकड परिसरातील भूमकर चौकात एक्यूआय ३१५ पर्यंत पोहोचला होता. ही पातळी एका दिवसात ३७ अंकांनी वाढली होती. हिंजवडी इन्फोटेक पार्क परिसराचा एक्यूआय देखील १९६ च्या आसपास नोंदवण्यात आला. भोसरी ३४२, निगडी ३४१ आणि भूमकर चौक ३१३ अशा अनेक भागांमध्ये प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
Pune News: NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन आठवड्यात दुसरी घटना, खळबळ
या वाईट हवा गुणवत्तेमुळे पिंपरी- चिंचवड शहर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक ठरले आहे. चोविसावाडी आणि मोशी येथील रहिवासी क्षेत्रात क्रशर प्लांट सुरू असून, यामुळे परिसरात हवा आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. सोसायट्यांमधील नागरिकांना घरात आणि वाहनांवर धुळीचे थर साचल्याचा त्रास होत आहे.
मेट्रोच्या कामाने हवा प्रदूषित
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, रविवारी दुपारी ४ वाजता वाकडमधील भूमकर चौकात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३०५ वर पोहोचला होता, जी अतिखराब पातळी मानली जाते. त्याखालोखाल शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत AQI २४४ (खराब) नोंदवला गेला. पाषाण (१२१), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (११६) आणि निगडी (१०८) येथे 'मध्यम' गुणवत्ता, तर हडपसर (८८) येथे समाधानकारक गुणवत्ता आढळून आली आहे.
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे उडणारी धूळ, त्याच बरोबर आर एम सी प्लांट आदींमुळे प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दिवाळीतील फटाक्यांमुळे ही गुणवत्ता आणखीच घसरली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तातडीने उपाययोजना करून प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
दरम्यान, पालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार, वाढती वाहने, औद्योगिकीकरण आणि बांधकामातून निर्माण होणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता बिघडत आहे. हवामानातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world