मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर टीका केली आणि 'महायुती सरकार कर्जमाफी देणारच आहे,' असे स्पष्टीकरण देत लागलीच सारवासारव केली.
माळशिरस येथे प्रकाश पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना विखे पाटील यांनी हा मुद्दा छेडला. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.
विखे पाटील नेमके काय म्हणाले?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले, "सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्ष काम चालू आहे. याची चिंता करायचं काम नाही."
शेतकरी कर्जबाजारी होण्यापूर्वीच कर्जमाफीची मागणी करतात, अशा आशयाचे हे विधान त्यांनी केले. मात्र, या विधानामुळे संभाव्य राजकीय टीका आणि शेतकऱ्यांमध्ये पसरणारी नाराजी लक्षात येताच, विखे पाटील यांनी त्वरित आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि सारवासारव केली.
ते पुढे म्हणाले, "महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. ते करणारच आहोत. आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत. परंतु, तिथंपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहे." विखे पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्ष आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world