- राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri News: रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले छत्रपती संभाजीनगरमधील पाच तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने हे पाचही जण पाण्यात बुडाले असून सध्या ते बेपत्ता आहेत. शनिवारी (20 जून) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून 19 जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सुटीचा आनंद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. पण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहोण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 5 जण प्रवाहामध्ये वाहून गेले.
युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी बोटींच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पण समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि वाढत्या लाटांमुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
बेपत्ता असलेल्या पर्यटकांची नावे
1. आदित्य राऊत
2. यश कांबळे
3. अनिकेत हिवराळे
4. प्रेम आदमाने
5. आनंद नरवडे
या पाचही तरुणांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.