कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या गुणांची अट आता शिथिल करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 12वी विज्ञानमध्ये 45 टक्के गुण आणि आरक्षित प्रवर्गासाठी 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. यापूर्वी ही अट खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के होती. कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सांगितले की, कोणताही इच्छुक विद्यार्थी कृषी पदवीच्या संधीपासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (Maharashtra Agricultural Education and Research Council) बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
( नक्की वाचा: बाराव्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर )
अर्ज कधीपर्यंत करता येणार ?
कृषी विद्यापीठांमध्ये बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अन्नशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व सामुदायिक विज्ञान अशा एकूण 9 पदवी अभ्यासक्रमांसाठी हे बदल लागू होतील. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 118 वी बैठक नुकतीच पार पडली, ज्यात या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 जुलै 2025 पर्यंत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.
( नक्की वाचा: माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार? कृषिमंत्रीपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर )
12वीच्या गुणांमध्ये वाढ होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 12वी (विज्ञान) अभ्यासक्रमात 'कृषी (808)' हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. मात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 115 व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार, आता या विषयासाठी 10 गुण अधिभार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केला.