आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि खासकरून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी एक सूचक विधान केलं ज्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येण्यास वातावपण पोषक असल्याचे बोलले जाऊ लागले.
'महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांच्या (मनसैनिक) मनातही कोणताही संभ्रम नाही. आम्ही संदेश न देता थेट बातमी देऊ', असं उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेल्या या विधानानंतर दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे संकेत मिळाले आहेत. लवकरच दोन्ही सेना एकत्र येणार असेही सांगितले जाऊ लागले आहे.
नक्की वाचा : "उद्धव साहेब एक फोन करा, आम्ही तयार आहोत", युतीच्या चर्चेवर मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे यांनी युतीबद्दलचे संकेत देत असताना जनतेच्या मनात काय आहे तेच होईल असे शब्द उच्चारले होते. यावरून मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी X वर एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका प्रमुखाला आता जनता आठवली का ? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी जनता बोलली होती का ?अजबच आहे हे!
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गट-मनसेच्या युतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की,"सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत असं आम्ही रोज रोज बोलून काही होणार नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे त्यावर निर्णय घेतील. जो पर्यंत प्रस्ताव येत नाही तो पर्यंत काही बोलता येत नाही. आमची जीभ 2014 आणि 2017 ला जीभ पोळली आहे. त्यामुळे आम्ही ताक फुंकून पित आहोत."