Sharad Pawar on Dharmendra Pradhan resignation : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घडामोडीमागील एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या आपल्या थेट चर्चेचा आणि हस्तक्षेपाचाच परिणाम म्हणून आज शिक्षण मंत्र्यांना पद सोडावे लागले, असा मोठा दावा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
काय म्हणाले पवार?
शरद पवार यांनी या बैठकीतील पडद्यामागील घडामोडींवर स्पष्टपणे मत व्यक्त केलं. आंदोलक विद्यार्थी आणि सरकार यांच्यात कोणताही संवाद उरलेला नव्हता, त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतला होता. पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन लोकशाहीत संवादाचे महत्त्व काय असते हे स्पष्ट शब्दांत मांडले. सरकारचा ताठरपणा कसा त्रासदायक ठरतोय हे सांगतानाच, एक तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करा, असा स्पष्ट सल्ला पंतप्रधानांना दिल्याचे पवारांनी सांगितले.
हा देशातील तरुणांच्या एकजुटीचा आणि संयमाचा मोठा विजय आहे. दडपशाहीला न घाबरता विद्यार्थ्यांनी हा लढा दिला आणि सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले, असे पवारांनी यावेळी सांगितले. तसेच या लढ्यात विद्यार्थ्यांना ठाम पाठबळ देणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचेही पवारांनी आभार मानले.
( नक्की वाचा : 'राष्ट्रविरोधी शक्ती गैरफायदा घेतील म्हणून...'; Dharmendra Pradhan यांनी राजीनामापत्रात काय सांगितलं? वाचा... )
पंतप्रधान मोदींशी चर्चेत काय झालं?
शरद पवार यांनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांशीही आपण चर्चा केली होती. सरकार चर्चेला तयार असल्यास संवाद नाकारू नका, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला होता. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनाही दोन ते तीन वरिष्ठ मंत्र्यांची समिती नेमून चर्चा सुरू करण्याचे सूचवले होते. पंतप्रधान मोदींनीही चर्चेची तयारी दर्शवली आणि याच संपूर्ण प्रक्रियेचा सकारात्मक परिणाम आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या रूपाने समोर आला.
दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि अश्रूधुराच्या वापराबाबत बोलताना पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. देश घडवणाऱ्या नव्या पिढीची आंदोलने हाताळताना बळाचा वापर करणे अत्यंत चुकीचे असून, प्रशासनाने हे प्रकार टाळले असते तर ते अधिक योग्य दिसले असते, असेही ते म्हणाले.