Shirdi Sai Baba : देशभरातील जागृत देवस्थानापैकी एक म्हणजे साईबाबांची शिर्डी. अहिल्यानगरमधील शिर्डी या देवस्थानात केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून भाविक येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानमध्ये मोठे बदल झाले आहेत. दररोज लाखो भाविक बाबांच्या दर्शनाला येत असतात. अशात भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
शिर्डीत भाविकांची पूजा साहित्याच्या माध्यमातून होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेनं क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. साई मंदिर परिसरातील सर्व प्रसाद, फुल-हार दुकानांवर आता दरफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहेत. यापुढे आता पुजेच्या प्रत्येक वस्तूंवर एमआरपी आणि एक्सपायरी डेट टाकणे अनिवार्य आहे.
नक्की वाचा - Shirdi Sai Baba: शिर्डीतील ‘साईंच्या नऊ नाण्यां'वरून नवा वाद पेटला, चक्क साईबाबांच्या डीएनएची मागणी
अनेक भाविकांनी वारंवार महागड्या दरांनी वस्तुंची विक्री केली जाते तसेच फसवणूक होत असल्याची तक्रार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुकानदारांना चढ्या भावाने पूजा साहित्य तसेच इतर वस्तुंची विक्री करता येणार नाही. सध्या शिर्डीतील दुकानांवर दरपत्रकं झळकले असून वस्तूंवर किंमत स्पष्ट दिसते. त्यामुळे भाविकांनीही त्या दरानुसार वस्तूंचे पैसे द्यावे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शिर्डी नगरपरिषदेकडून यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्यात येत असून प्रत्येक दुकानांवर दरपत्रक लावण्यात आले आहे. याचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.