मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News : अकरावी सायन्स वर्गात प्रवेश देण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि लिपिकाने मिळून दहा हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शिक्षक गुलाब साळुंखे व लिपिक उल्हास बागुल या दोघांना अटक केली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तक्रारदाराचा मुलगा याच शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी अकरावी सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा होता. यासाठी तक्रारदार व मुलाने शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी एकूण 20 हजार रुपयांची मागणी केली.
यातील दहा हजार रुपये ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर लगेचच देण्यास सांगितले होते. तर उर्वरित दहा हजार रुपये प्रवेश घेताना द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. तक्रारदाराने लगेचच धुळे एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षक गुलाब साळुंखे यांना रंगेहात पकडले. त्यानंतर लिपिक उल्हास बागुल यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून, शालेय प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.