संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमुरची घोडा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. चिमुरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री 12 वाजेनंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जग्गन्नाथ पुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं. त्यानंतर तिची पहाटेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती. जवळपास 300 वर्षांपासून सुरु असलेल्या या घोडा-रथ यात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली होती.
नक्की वाचा - Pune News : तानाजी सावंत यांच्या सुपुत्राचं अपहरण नाही तर स्वखुशीने 68 लाख खर्च करून बँकॉक टूर
कशी सुरु झाली यात्रा?
पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली. या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोक चिमूरमध्ये दाखल होतात.
(नक्की वाचा- पाणीपुरी विक्रेत्याला GST ची नोटीस, कमाई पाहून अधिकारीही झाले थक्क!)
तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे या काळात चिमूरमध्ये लोकांची मोठी गर्दी होते. 1942 ला इंग्रजांविरुद्ध झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये सुद्धा या बालाजी मंदिराची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतरही लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे.