लक्ष्मण सोळुंके, वर्धा: वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाद्वारे वैद्यकीय इतिहासात दुर्मिळ ठरणारी एक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेण्यात आली. अवघ्या दीड महिन्याच्या एका बालिकेच्या पोटात वाढलेल्या भ्रूणसदृश्य गोळ्याचे शस्त्रक्रियेद्वारे निर्मूलन करण्यात आले. 'फीटस इन फिटू' या अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारातील ही शस्त्रक्रिया होय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फीटस इन फिटू म्हणजे आईच्या गर्भात वाढणाऱ्या एका भ्रूणाच्या शरीरात दुसरा भ्रूण वाढणे होय. ही नैसर्गिकरित्या घडून येणारी दुर्मिळ वैद्यकीय घटना असून आईच्या पोटात दोन भ्रूण तयार झाल्यास ते जुळे म्हणून जन्माला न येता एका भ्रूणात दुसरे भ्रूण वाढते. गर्भावस्थेतील काही विशिष्ट परिस्थितींमध्ये जुळ्यांपैकी एक गर्भ विकसित न होता दुसऱ्या गर्भामध्ये सामावतो आणि त्याच्या शरीरातच वाढू लागतो.
ही स्थितीचे सामान्यतः बाळाच्या जन्मानंतर निदान होते आणि वेळीच लक्षात आल्यास शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्या वाढलेल्या गोळ्याचे पूर्णपणे निर्मूलन करणे शक्य असते. अशी घटना 10 लाख गर्भवती स्त्रियांमध्ये एखादीच आढळून येते. सावंगी रुग्णालयात बाळंतपणासाठी भरती झालेल्या स्त्रीने एका बालिकेला जन्म दिला. या बालिकेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे प्राथमिक तपासणीत डॉक्टरांच्या लक्षात आले. बाळाची अद्यावत उपकरणांद्वारे तपासणी केली असता आणखी एक बाळ या नवजात बालिकेच्या पोटात असल्याचे निदान झाले. बालिकेचे वजन साडेचार किलोग्रॅम होते. तिच्या पोटात वाढलेला गोळा सुमारे 500 ग्रॅम वजनाचा होता.
हा मांसल गोळा नवजात बालिकेच्या जीवाला धोका निर्माण करणारा असल्याने डॉक्टरांनी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. आर.के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बालशल्यचिकित्सक डॉ. थवेंद्र दिहारे यांनी डॉ. खुशबू वैद्य व डॉ. आयुष गांधी यांच्या सहकार्याने ही अवघड शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेली. शस्त्रकियेनंतर वाढलेल्या गोळ्याची तपासणी केली असता त्यात केस, कानाचे अवशेष, बोटांसारखे अवयव आणि इतर काही शरीरविकसनाशी संबंधित भाग दिसून आल्याचे डॉ. आर.के. शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच या बालिकेला व्हेंटिलेटरवरून काढून सामान्य अवस्थेत ठेवण्यात आले. अत्यंत गुंतागुंतीच्या व तितक्याच नाजूक अवस्थेतील या शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीतच बालिकेची प्रकृती स्थिर झाली असून तिला मातेद्वारे आहारही सुरू करण्यात आला आहे. इतक्या लहान वयातील बाळासाठी ही जोखिमेची शस्त्रक्रिया असून अचूक निदान, डॉक्टरांचे कौशल्य, अनुभवसंपन्नता, रुग्णालयातील समन्वय व प्रगत वैद्यकीय सुविधांमुळे हे शक्य झाले, असे डॉ. थवेंद्र दिहारे यांनी सांगितले.
Maharashtra Politics: मोठी बातमी! राज ठाकरेंनी अमित शाहंची भेट नाकारली? मनसे नेत्याचा दावा