राकेश गुडेकर, रत्नागिरी
Ratnagiri News : मुले मोबाईलच्या आहारी गेलेत पालकांची ही तक्रार आता खूप सामान्य झाली आहे. मात्र मुले मोबाईलमध्ये आपला वेळ कशासाठी घालवत आहेत, याची माहिती किमान पालकांना असायला हवी. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या नाणीज येथे असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मोबाईल गेमच्या नैराश्येतीन तरुणाने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे मोबाईलमधील गेमची सवय लागून नैराश्येतून महाविद्यालयीन युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रवींद्र राजेंद्र बेंद्रे असं मृताचं नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात झाली आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: नातवानेच आजीला कचरापेटीत सोडल्याचं झालं सिद्ध; त्या रात्री नेमकं काय झालं?)
रवींद्र हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी नाणीज येथे मामा विकास पोपट यांच्याकडे आला होता. त्याने नाणीज येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. रवींद्रला मोबाईलमध्ये गेम खेळण्याची सवय लागली होती. ती सुटत नसल्याने तो सातत्याने बैचेन होता. यामुळे रवींद्रला एकप्रकारे नैराश्य आले होते.
यातूनच रवींद्रने राहत्या खोलीच्या लोखंडी बारला टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Crime : 'हेरिटेज योगा सेंटर'मध्ये सेक्स अन् ड्रग्जचे वर्ग; प्रसिद्ध योग बाबाच्या आश्रमात छापा)
पण या घटनेमुळे मोबाईलचं हे एकप्रकारे व्यसन तरुणाईला कोणत्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतंय हे गेल्या काही घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर तरुणाईने टाळायला हवा.