शुभम बायस्कार, प्रतिनिधी
अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. अशातच दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे (Shvisena UBT) गटाला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे उमेदवार असलेले उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी भाजपची वाट धरली आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुनील खराटे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रवेश घेतल्याबरोबरच सुनील खराटेंची प्रतिक्रिया ही समोर आली आहे. विरोधी पक्षात असताना माझ्या आवाजाला दुर्लक्ष करण्यात आल्याचं म्हणत त्यांनी एक प्रकारे पक्ष नेतृत्वाला घरचा आहेर दिल्याचं मानलं जात आहे.
सुनील खराटेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले की, भाजप स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे. इथे विकासाला प्राधान्य दिले जाते. राष्ट्रहितासाठी स्पष्ट दिशा आणि निर्णयक्षम नेतृत्व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षात असताना माझ्या आवाजाला दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे एकप्रकारे खराटेंनी स्व पक्षाला घरचा अहेर देत ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केलाय, असं मानलं जात आहे.
( नक्की वाचा : राहुल गांधी यांचे 'मॅच फिक्सिंग'चे आरोप हास्यास्पद! निवडणूक आयोगाचं सर्व मुद्यांना सविस्तर उत्तर )
ठाकरेंनी घेतली होती सभा
बडनेरा मतदारसंघाचे माजी आमदार स्व.संजय बंड यांच्या पत्नी प्रीती यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालवली होती. त्यांनाच तिकीट मिळेल असं समीकरण तयार झालेलं असतानाच एन वेळेवर प्रीती बंड यांचा पत्ता कट करत उद्धव ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं.
आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करत ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यामुळे राणांना पराभूत करण्यासाठी रानांच्या होम पिचवर दस्तुरखुद्द सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी बडनेरा येथे सभा घेतली होती. तरीदेखील ठाकरेंच्या उमेदवाराला येथे विजय मिळवता आला नाही. परिणामी बडनेरा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने आमदार रवी राणा विजय झाला होता. त्याचं खराटेंनी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे.