Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना, राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांची पातळी खालावताना दिसत आहे. एनडीए (NDA) आणि महागठबंधनचे (Mahagathbandhan) नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधींनी मुजफ्फरपूर येथील एका जाहीर सभेत बोलताना, 'पंतप्रधान मोदी केवळ मतांसाठी काहीही करू शकतात, अगदी स्टेजवर येऊन नाचूही शकतात,' असे म्हटले आहे.
काय म्हणाले राहुल?
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "त्यांना (पीएम मोदींना) फक्त तुमचे मत हवे आहे. तुम्ही जर त्यांना सांगितले, 'नरेंद्र मोदी, तुम्ही हे नाटक करा,' तर ते करतील. तुम्ही जर त्यांना म्हटले की, 'आम्ही तुम्हाला मत देऊ, तुम्ही स्टेजवर येऊन नाचा,' तर ते स्टेजवर येऊन नाचूही शकतील."
"निवडणुकीपूर्वी जे काही करून घ्यायचे आहे, ते करून घ्या. कारण, निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तुम्हाला दिसणार नाहीत," असा आरोपही राहुल यांनी केला.
राहुल गांधींनी यावेळी उपस्थितांना महागठबंधनच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. "महागठबंधनचे सरकार सर्व समाज आणि धर्मांचे सरकार असेल. बिहारला पुढे घेऊन जाणे, ही आमची प्राथमिकता आहे," असे ते म्हणाले.
जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित
राहुल यांनी या भाषणात जातीय जनगणनेचा (Caste Census) मुद्दा उपस्थित केला. "लोकसभेत आम्ही पंतप्रधानांना जातीय जनगणना करण्याची मागणी केली होती, पण त्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बिहारच्या लोकांचे कौतुक करताना राहुल गांधी म्हणाले की, "इथले लोक सर्वत्र दिसतील. त्यांनी दिल्ली उभी केली, बंगळुरूचे रस्ते बनवले, गुजरातमध्ये काम केले आणि मुंबईला मदत केली. फक्त हिंदुस्तानच्या रस्त्यांचीच गोष्ट सोडा, दुबईसुद्धा बिहारमधील लोकांच्या मेहनतीनेच उभे राहिले आहे."
( नक्की वाचा : Bihar Election: पोलिंग बूथवर फक्त 1200 मतदार; मोबाईल नेता येणार, बिहार निवडणुकीत पहिल्यांदाच 10 ऐतिहासिक बदल )
बिहारचे लोक इतर राज्यांमध्ये जाऊन विकास घडवू शकतात, तर तेच काम ते बिहारमध्ये का करू शकत नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. एका खासदाराचा उल्लेख करत ते म्हणाले की, "बिहारमधील तरुण सांगतात की, त्यांना इथे रोजगार मिळत नाही. गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार (Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वतःला अति-मागासवर्गीय म्हणवून घेतात, पण शिक्षण (Education), आरोग्य (Health) आणि रोजगार (Employment) या क्षेत्रात त्यांनी काय सुधारणा केली? जिथे तुम्हाला तुमच्याच राज्यात काही मिळत नाही, असा बिहार तुम्हाला हवा आहे का?"
राहुल गांधींनी पुढे 'मेड इन चायना' (Made in China) उत्पादनांचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, "तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मागे बघा, त्यावर 'मेड इन चायना' (Made in China) लिहिलेले असेल. आम्हाला हे बदलायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी (Demonetisation) आणि चुकीची जीएसटी (GST) लागू करून बिहारमधील लहान व्यावसायिकांना उद्ध्वस्त केले आहे. आजूबाजूला तुम्ही जे काही पाहाल, त्यावर 'मेड इन चायना' लिहिलेले असेल."
( नक्की वाचा : 8th Pay Commission: लॉटरी लागली! 'फिटमेंट फॅक्टर'नुसार पगार दुप्पट होणार? तुमचं वेतन किती वाढेल? इथं करा चेक )
"आम्हाला आता हे बदलायचे आहे. आता प्रत्येक वस्तूवर, मग तो मोबाईल असो किंवा पॅन्ट-शर्ट, यावर 'मेड इन बिहार' (Made in Bihar) असे लिहिलेले असावे. बिहारमधील तरुणांना रोजगार मिळावा आणि येथील कारखान्यांमध्येच सर्व वस्तू तयार व्हाव्यात," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.