- भाजप नेते नितेश राणे यांनी बकऱ्याच्या कुर्बानीवरून मुस्लिम समाजाला आक्रमकपणे लक्ष्य केले
- भाजपच्या हाजी अराफत शेख यांनी नितेश राणेंना घरचा आहेर दिला आहे
- शेख यांनी नितेश राणे यांना त्यांचे ही मटणाचे दुकान आहे हे दाखवून दिले
बकरी ईदची सगळीकडे तयारी सुरू आहे. अशा वेळी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. बकऱ्याची कुर्बानी देण्यावरून त्यांनी मुस्लिम समाजाला डिवचले आहे. शिवाय कारवाईचा इशारा ही दिला आहे. असा स्थितीत भाजपचेच एक नेते नितेश राणे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांच्यावर थेट आणि बोचरी टीका करत घरचा आहेर दिला आहे. "तुमच्या वडिलांनी मटणाच्या दुकानापासूनच सुरुवात केली होती," अशी आठवण करून देत शेख यांनी राणेंना डिवचले आहे. शिवाय ईदनिमित्त मटण खाण्याचे थेट निमंत्रण ही दिले आहे.
हाजी अराफत शेख यांनी नितेश राणेंना सल्ला देताना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाचा उल्लेख केला. शेख म्हणाले, "नितेश राणे यांनी थोडी समजदारी दाखवण्याची गरज आहे. हा ईदचा सण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे स्वतःचेही एक मटणाचे दुकान आहे. त्यांच्या वडिलांनी एका मटणाच्या दुकानापासून सुरुवात करून मंत्रीपदापर्यंत आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून झेप घेतली होती. चेंबूरमध्ये त्यांचे स्वतःचे एक हॉटेल आहे, ज्याला त्यांनी आपल्या आईचे नाव दिले आहे. तिथे ते उत्तम दर्जाचे खेकडे, मासे आणि मटण मसाला विकतात." त्यावेळी त्यांना कोणती अडचण येत नाही असं ते म्हणाले.
नितीश राणे यांना हाजी अराफत शेख यांनी एक सल्ला ही दिला आहे. ते म्हणतात तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या मटणाच्या दुकानाकडे आणि तुमच्या हॉटेलकडे एकदा पाहा. शिवाय जर तुम्ही रविवारी मटण खात असाल, तर मटणाऐवजी एकदा कागद खाऊन नक्की पहा. म्हणजे तुम्हाला त्याची चव कशी असते, हे समजेल. पण जेव्हा मी तुमच्या हॉटेलमध्ये जातो, तेव्हा तिथलं जेवण अतिशय चविष्ट असतं आणि मटणही उत्तम असतं असं सांगत त्यांनी राणेंना टोला लगावला आहे.
शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणारी वाहने अडवली जात असल्याचा मुद्दा शेख यांनी उपस्थित केला. कसाई समाजाची व्यथा यातून त्यांनी मांडली. ते म्हणाले, "या कारवाईमुळे हिंदू कसाई बांधवांना खूप त्रास होत आहे. धनगर समाज आणि मुस्लिम समाजही यामुळे व्यथित आहे. कसाई समाजाला वर्षातून एकदाच मोठी कमाई करण्याची संधी मिळते. चेंबूरमधील तुमच्या दुकानात चांगला व्यवसाय चालतो, मग आमच्या व्यवसायाचाही विचार करा. नितेश राणेंनी त्यांचे वडील नारायण राणे यांच्याकडून राजकीय बोध घ्यावा." तसेच त्यांनी राणेंना ईदच्या दिवशी घरी येऊन मटणाचा आस्वाद घेण्याचे निमंत्रणही दिले.