मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण राजकीय पक्षांनी त्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुंबई मनपाची होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. तर दुसरीकडे मुंबईवर ही वर्चवस्व मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढेल. तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने श्रीकांत शिंदेंना मैदानात उतरवण्याची रणनिती आखली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना श्रीकांत शिंदेच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली लढवणार आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचा चेहरा असेल पण श्रीकांत शिंदे यांचे नियोजन असेल अशी रणनिती आखली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही श्रीकांत शिंदेंवर दिली जाण्याची शक्यता आहे. उद्याच्या शिवसेना मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांची राजकारण आणि विकासासंदर्भात जाहीर मुलाखत मुलाखत होणार आहे. त्यावेळी याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
शिवसेना फुटल्यानंतर अनेक आमदारांनी आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यात मुंबईतल्या ही आमदारांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची मुंबईतली ताकद पुन्हा एकदा दिसून आली. ठाकरेंचे तिन खासदार निवडून आले. एक उमेदवार अवघ्या काही मतांनी पडला. त्यानंतर शिंदेंनी मुंबईवर अधिक लक्ष्य केंद्रीत केले. ठाकरेंच्या गटातील एक एक नगरसेवक त्यांनी आपल्या गळाला लावले. जवळपास पन्नास पेक्षा जास्त माजी नगरसेवक आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहे. त्यामुळे अगामी मुंबई महापालिकेत शिंदे हे ठाकरें समोर मोठं आव्हान निर्मा करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका आणि शिवसेना हे एक समिकरण बनलं आहे. गेली 25 वर्षे सतत मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या हातात राहीली आहे. आता शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे महापालिका आपल्या ताब्यात घेण्याची स्वप्न भाजपला पडत आहेत. शिवसेनेत पडलेल्या फूटीचा थेट फायदा भाजपला होवू शकतो. त्यात एकनाथ शिंदें ही आपली ताकद दाखवण्याची जोरदार तयारी करत आहेत. मनसेचं अजूनही तळ्यात मळ्यात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक ही अगदी चुरशीची होणार आहे. त्यासाठी आतापासूनच दोन्ही शिवसेनेसह सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.