
प्रांजल कुलकर्णी
गळ्यात भाजपचं उपरणं घालून सुधाक बडगुजरांनी जय श्रीरामचा नारा दिला. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत ठुमके लगावणारे बडगुजर भाजपसाठी अचानक प्रखर हिंदुत्ववादी झाले. कालपर्यंत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी बडगुजरांचा पक्षप्रवेश हा कसा नैतिकतेला धरुन आहे, हे सांगण्याची अशक्य कसरत केली. पण आज तीच कसरत करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत जड जात होतं. अर्थात देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना क्लीन चिट देऊन, बडगुजरांना विरोध करणाऱ्या त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना तोंडावर पाडलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फडणवीसांनी बडगुजरांचं स्वागत करताना तीन मुद्द्यांवर भर दिला. कारवाई न होणं.आरोप ठाकरे गटात असताना होणं. आणि इलेक्टोरल मेरिट असणं.फडणवीस यावर म्हणाले, चौकशीअंती त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आरोप झाले, ते शिवसेनेमध्ये असताना झाले होते. शेवटी त्यांनी भरपूर मतं घेतली आहेत, आपल्याला पक्ष वाढवायचा आहे असं फडणवीस म्हणाले. सलीम कुत्ता प्रकरणी बडगुजर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बडगुजर यांच्यावरच्या कारवाईचा स्टेटस नेमका काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
2023 साली सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता या दहशतवादाच्या आरोपीसोबत डान्स केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये सुधाकर बडगुजरांवर आडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला. आडगाव पोलीस निरीक्षक, त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्याकडे तपास होता. सरकारने या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचं आश्वासन दिलं. पण ती एसआयटी कधी अस्तित्वातच आली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात आणि त्याची पुढील सुनावणी महिन्याभरानंतर म्हणजेच 16 जुलै 2025 ला होणार आहे.
त्यामुळे प्रश्न असा आहे की, जर अजून महिन्याभरानंतर या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे, तर मग बडगुजर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असं म्हणत फडणवीसांनी क्लीन चिट का दिली? प्रश्न असा आहे की बडगुजर यांची चौकशी सुरु असतानाही भाजपने त्यांना क्लीनचिट कशी दिली? बडगुजरांवर कारवाई नं होणं हा त्यांना पक्षप्रवेश देण्याचा निकष कसा असू शकतो? उच्च न्यायालयात सुनावणी होणार असतानाही, त्यांना भाजपने निर्दोष कसं मानलं? दहशतवाद्याशी संबंधांचे आरोप भाजपला गंभीर वाटत नाहीत का? या प्रश्नांची उत्तर भाजपला द्यावीच लागणार आहेत.
पण प्रश्न असा आहे, की पक्ष वाढवायचा म्हणून बाकीचे सगळे आरोप बाजूला सारून इलेक्टोबर मेरिटचाच विचार करायचा हे जरी मान्य केलं, तरी बडगुजर यांची भाजपला खरंच इतकी गरज आहे का? भाजप हा पक्ष बारा महिने चोवीस तास इलेक्शन मोडवर असतो. निवडणुका जिंकण्यासाठी युद्धासारखी तयारी करतो. ज्याचे रिझल्ट आपल्याला लोकसभेपासून विधानसभेपर्यंत दिसले. त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये करायची आहे. त्यासाठी भाजप कुणालाही पवित्र करेल आणि कुणालाही अपवित्र करेल. कारण युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ असतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world