- चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे
- काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले असून दोन्ही गटांनी महापौरपदावर दावा केला होता
- शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांनी स्वतंत्र गट तयार करून महापौरपदासाठी दबाव टाकला आहे
राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस चंद्रपूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ आहे. पण पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस इथंली सत्ता गमावते अशी स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसचे महापालिकेत 27 नगरसेवक निवडून आले आहेत. हे नगरसेवक खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात विभागले गेले. दोन्ही गटांनी महापौरपदावर दावा केला. शिवाय दोन वेगवेगळे गट नोंदवण्याचा प्रयत्न ही केला. ऐवढेच काय तर नगरसेवकांचे अपहरण करण्याचा आरोप ही झाला. त्यामुळे हा वाद टोकाला गेला होता.
त्यात शिवसेना ठाकरे गट आणि वंचितने स्वत:चा गट तयार केला. त्यांच्या पाठिंब्या शिवाय कुणाचाही महापौर होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनीही महापौरपदासाठी दबाव टाकला आहे. अशा स्थिती भाजपची सत्ता स्थापन करण्याची संधी वाढली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही तोडगा काढता आला नाही. त्यामुळे वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला. वडेट्टीवार हे आपले समर्थक 20 नगरसेवक घेवून दिल्लीत दाखल झाले होते.
काँग्रेस नेते के.सी वेणूगोपाल यांच्या सोबत वडेट्टीवार आणि धानोरकर यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही गटांनी महापौरपदावर आपला दावा सांगितला. त्यात वेणूगोपाल यांनी दोन्ही नेत्यांची समजूत काढली आहे. त्यानुसार चंद्रपूर महापौरपदावर तोडगा ही काढण्यात आला आहे. महापौरपद हे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला देण्यात येणार आहे. तर उपमहापौरपद हे वडेट्टीवार गटाकडे राहील. स्थायी समिती म्हणजेच तिजोरीच्या चाव्या शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात देण्याचे ठरले आहे. तसे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले असल्याचं सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे चंद्रपूर महापौरपदाचा तोडगा सुटलं असल्याचं बोललं जात आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मागे टाकत विजय मिळवला आहे. भाजपला या निवडणुकीत 23 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या जन विकास सेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे 30 नगरसेवक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत.तर 2 वंचितचे नगरसेवक आहेत. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी चार नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसला सध्या तरी सत्ता स्थापनेची संधी आहे. शिवसेनेला स्थायी समिती देण्याचे ठरले आहे. त्यामुळे त्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेसला असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world