'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन' मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप

CM Eknath Shinde on Badlapur Protest : 'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

Advertisement
Read Time: 2 mins
C
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

CM Eknath Shinde on Badlapur Protest : बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यानं केलेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या प्रश्नावर संतप्त बदलापूरकरांनी मंगळवारी शाळेच्या गेटवर धाव घेत जोरदार आंदोलन केलं. त्याचबरोबर रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. महाविकास आघाडीनं या प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं आहे.

बदलापूरमध्ये घटना दुर्दवी आहे, पण या विषयावर बदलापूरमध्ये झालेलं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतरही मुख्यमंत्री या वक्तव्यावर ठाम आहेत. 'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

कोल्हापूरमधील तपोवनमध्ये आज (गुरुवार, 22 ऑगस्ट) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा आरोप केला.

'लाडक्या बहिणींना आधार देण्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये बहिणी स्वत: उपस्थित राहतात. ही योजना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी आहे. या योजनेला कसा खोडा घालायचा, ही योजना कशी बदनाम करायची, याबाबतीत सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. 

( नक्की वाचा : 'बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत' )
 

जे आंदोलन बदलापूरमध्ये झालं, तिथं लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर आले.  त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या योजनेला परिणाम करण्यासाठी रेल रोको केलं. रेल रोको करुन सात- आठ तास लोकांना वेठीस धरणं हे कोणतं राजकारण आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. काही बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही युक्ती विरोधकांनी अवलंबली आहे, त्यांना सडेतोड उत्तर माझ्या लाडक्या बहिणी देतील, ' असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Advertisement