
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित आहे असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. शिवाय उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या सोबत जावं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेने अंतर्गत खळबळ उडाली होती. याबाबत आता शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याच कदम यांच्या बरोबर किर्तीकर यांचे खटके उडाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रामदास कदम यांनी याबाबतही पक्षाची भूमीका स्पष्ट केली आहे. गजानन किर्तीकर जे काही बोलले ते त्यांचे वैयक्तीक मत होते. ते पक्षाचे मत नाही. याबाबत माझं आणि त्यांचं बोलणं झालं आहे. मुंबईला गेल्यावर आपण त्यांच्याबरोबर या विषयी चर्चा करणार आहोत. शिवाय जे काही मतभेद होते ते आता दूर झाले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही असं ही त्यांनी स्पष्ट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला.
उद्धव ठाकरे हे संधीसाधू नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या जवळ जाणार नाहीत. हे त्यांनाही माहिता आहे. आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. पण उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिला नव्हता. हे राज ठाकरे विसरले नसतील असंही कदम म्हणाले. शिवाय राज यांचे सात नगरसेवकही याच उद्धव ठाकरे यांनी फोडले होते. याची ही आठवण राज यांना असेल. त्यामुळे राज ठाकरे हे कधी ही उद्धव यांच्या बरोबर जाणार नाहीत असं ही त्यांनी सांगितलं.
ठाकरे ब्रँड हा आता उद्धव यांच्याकडे नाही. तो आमच्या शिवसेनेकडे असलेल्याचं कदम म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचे विचार आणि पक्षाचं चिन्ह ही आमच्याकडेच असल्याचं रामदास कदम म्हणाले. त्यामुळे ठाकरे ब्रँड हा आमचा आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पवार कुटुंब एकत्र येणार असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, की मग ते कुटुंबा आता एकत्र नाही असं तुम्हाला वाटतयं का असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला. शिवाय पवार हे एकत्रचं असल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष पणे सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world