पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. यावरू सरकारवर आणि पालकमंत्री असेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला आता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केरळवरून पाऊस आपल्याकडे योते. हा पाऊस 15 दिवस आधीच आला आहे. त्यामुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. कंट्रोल रुममधून मुंबईतले सगळे स्पॉट पाहिले. सगळीकडे पंपांची व्यवस्था केली आहे असं ही ते या वेळी म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाऊस 10-15 जूनपर्यंत येईल, त्या हिशोबाने आपण तयारी करतो. मात्र यंदा पाऊस आधी आला. आकडेवारी पाहिल्यास 12 तासात नरीमन पॉईंटला 252 मिमी पाऊस झाला. महापालिका मुख्यालय 216 मिमी, कुलाबा 207 मिमी पाऊस झाला. साधारणपणे इथे 50 मिमी पाऊस होतो. हे ढगफुटीसारखंच झालं आहे. अचानक पाऊस आल्यामुळे पाणी साचलं होतं. मात्र आता पाणी साचलेलं नाही. वाहतूक सुरळित सुरू आहे. हार्बर रेल्वेची सेवा फक्त 10 मिनिटे बंद होती. नालेसफाई सुरूच आहे, ती आता पूर्ण होईल असं ते म्हणाले. पावसाने लवकर आगमन केल्याने धावपळ झालेली आहे असं त्यांनी कबूल केलं.
नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी महापालिका घेईल. विक्रोळी भागात जिथे लँडस्लाईड होते तिथे सेफ्टी नेट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही गोष्टी झालेल्या आहेत. सगळे पंप पूर्ण क्षमतेने चालतील आणि चालत आहेत. म्हणून तर हिंदमाता आणि अन्य भागातील पाण्याचा निचरा झाला आहे असा दावा शिंदे यांनी केला. यावेळी नालेसफाईत एआयचा वापर झाला आहे. रोबोटच्या सहाय्याने सफाई करण्यात आली आहे. जिथे पाणी साचले असेल, नालेसफाई झाली नसेल तिथले व्हिडीओ महापालिकेच्या यंत्रणेवर अपलोड करता येतील. महापालिका त्याची तत्काळ दखल घेईल असं ही ते म्हणाले.
नालेसफाई 100 टक्के होईल. रेल्वेचेही नाले साफ झाले पाहीजे. त्यांनीही पंपांची व्यवस्था केली आहे. जेणेकरून पाणी साचेल त्याचा निचरा करता येईल. रेल्वे, मेट्रो थांबेल, रेल्वे सेवा बंद पडेल, तेव्हा टॅक्सी, बेस्ट बस सेवा सुरू होतील याची व्यवस्था करायला हवी. गेल्या वर्षीही आम्ही ते केले होते. यावेळी फक्त 10 मिनिटे हार्बरची रेल्वे सेवा बंद पडली होती.420 पंप मुंबईत लावण्यात आले आहेत. गरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येतील. 30-35 वर्षात इतका पाऊस आधी आलाच नव्हता. इथे रेग्युलर मॉन्सूनच सुरू झाला आहे. एका तासात 250 मिमी पाऊस झाला आहे अशी माहिती ही त्यांनी दिली.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
25 वर्षात सिमेंटचे रोड का बनवले नाही ? का लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला. किती अपघात झाले, किती लोकांना जीव गमवावा लागला. आम्हाला यात राजकारण आणायचे नाही. आम्हाला काम करायचे आहे, असं त्यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना म्हटलं. जिथे पाणी साचणार नाही तिथल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू, जिथे पाणी साचेल आणि तिथे काम नीट झाले नसेल तर तिथल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरू असं ही शिंदे यांनी ठणकावलं.