Exit Polls : 'Nonsense...' एक्झिट पोलवर भडकले निवडणूक आयुक्त, जाहीरपणे दिला सल्ला

Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयोगानं एक्झिट पोलवर गंभीर प्रश्न उपस्थित केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

निवडणूक आयोगानं (Election Commission) मंगळवारी (15 ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक 2024  (Maharashtra Jharkhand Assembly Elections 2024)  च्या तारखांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 13 राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघातील (नांदेड, वायनाड) पोटनिवडणुकांची (Bypoll 2024)  घोषणा झाली आहे. मतदानाच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगानं एक्झिट पोलवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाचे हात बांधलेले आहेत. पण, त्यावर नजर ठेवणार्या संस्थांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी चुकले एक्झिट पोल?

लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही एक्झिट पोलचा अंदाज चुकला. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला मोठं बहुमत दाखवण्यात आलं होतं. पण, 8 ऑक्टोबर रोजी निकाल अगदी उलटे आले. हरियाणामध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वासहर्तेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

एक्झिट पोलच्या सर्वेक्षणावर मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी सांगितलं की, 'एक्झिट पोलवर आत्मचिंतणाची गरज आहे. एक्झिट पोल सर्वेक्षणाचा साईज काय आहे? त्यावर चर्चा व्हायला हवी. निष्कर्ष चुकले तर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. यावर लक्ष ठेवणऱ्या संस्था आहे. कठोर कारवाईची आवश्यकता आहे. मला आशा आहे की त्या संस्था या विषयावर काम करतील. 

( नक्की वाचा :  Maharashtra Election : 2024 मध्ये महायुती की मविआ? आकडेवारीतून समजून घ्या निवडणुकीचं चित्र )

राजीव कुमार म्हणाले, 'साधारणपणे मतदान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून कुणाचं सरकार होणार आहे याबाबत एक आशा दाखवली जाते. तसंच होणार आहे असं लोकांना वाटतं. पण, एक्झिट पोलला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होते. सुरुवातीला टपाल मतांची मतमोजणी होते. पण, वृत्तवाहिन्यांवर 8 वाजून 5 मिनिटांपासून निकाल येऊ लागतात. हे एकदम बकवास आहे.'

मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं की, 'मतमोजणीच्या पहिल्या फेरीची मतमोजणी 8.30 मिनिटांनी सुरु होते. पण, वृत्तवाहिन्यांवर 8.15 पासूनच आघाडी दाखवली जाते. आमच्याकडं त्याबाबत पुकरावे आहेत. निवडणूक आयुक्त सकाळी 9.30 वाजता पहिल्या फेरीचा व्होटिंग ट्रेंड वेबसाईटवर अपलोड करतो. प्रत्यक्ष निकाल हे ट्रेंडप्रमाणे नसतात त्यावेळी प्रकरण गंभीर होते. आम्हाला स्वत:हून सुधारणा करण्याची अपेक्षा आहे.'