विशाल पाटील, प्रतिनिधी
Shiv Sena Performance Report: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता सत्ताधारी शिवसेनेतही अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठी फेरबदल करण्याची शक्यता असून संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवण्याचे संकेत मिळाले आहेत. पक्षातील सक्रिय आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचे वर्गीकरण करून लवकरच काही कठोर निर्णय घेतले जाणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रक्रियेमुळे आगामी काळात शिवसेनेत मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत.
पदाधिकाऱ्यांचे प्रगती पुस्तक तयार होणार
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही काळात ज्या पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक काम केले नाही किंवा जे केवळ पदावर असून जमिनीवर सक्रिय नाहीत, अशांना पदावरून हटवले जाणार आहे.
राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रगती पुस्तक येत्या 15 दिवसात तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावरील कामाचा आढावा घेतला जाणार असून, ज्यांची कामगिरी सुमार असेल त्यांना बाजूला करून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.
( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )
मंत्र्यांच्या कामगिरीवरही लक्ष
केवळ पदाधिकारीच नाही तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीवरही शिंदे करडी नजर आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे साहेब स्वतः नेहमी ॲक्टिव मोडवर असतात आणि ते प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेत असतात.
आता केवळ लोकसभा किंवा मोठ्या निवडणुकांचे लक्ष्य नसून तालुका आणि गाव स्तरावर पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या खात्यात आणि मतदारसंघात किती प्रभावी काम केले, याचाही विचार केला जाणार आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांनो, आता कोथरुडचा ट्रॅफिक जाम विसरा!अनेक वर्षांपासून प्रलंबित 'या' रस्त्याचा प्रश्न सुटला )
काम न करणाऱ्यांना डच्चू; नव्यांना संधी
उदय सामंत यांनी दिलेल्या संकेतांनुसार, ज्यांनी केवळ पदे घेतली आहेत पण कामाच्या पातळीवर शून्य आहेत, अशा पदाधिकाऱ्यांना आता पक्षात स्थान नसेल. निवडणुकीत ज्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, अशा ठिकाणच्या जबाबदार नेत्यांना थांबवण्याचे संकेत साहेबांनी दिले आहेत. आपले कामही तपासले जाणार असल्याचे सामंत यांनी मान्य केले आहे.
11 तारखेपासून महाराष्ट्र दौरा
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 11 तारखेपासून महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान राज्यभरातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला जाईल. या दौऱ्यानंतर मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आणि तयार होणाऱ्या प्रगती पुस्तकानुसार मोठ्या नियुक्त्या आणि बदलांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.