मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सोमवार पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई गाठणार. 27 ऑगस्टला अंतरवाली सोडणार. आता मुंबईत जायचं म्हणजे जायचं. आता मागं हटायचं नाही. काही झालं तरी विजय मिळवूनच मागे फिरायचं असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक झाली. त्यात पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं. तुम्हाला मानावं लागेल की तुम्ही फुटले नाह. ताकद काय आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. आता पुन्हा एकदा लढायचं आहे. मैदान गाजवायचं आणि विजय मिळवल्या त्याशिवाय परत यायचं नाही असं आवाहन मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता मराठ्यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. विजय मिळवून गुलाल फेकायचं असा निर्धार ही त्यांनी केला आहे.
आता अंतिम लढाई आहे. ही लढाई आरपारची आहे. 2 वर्षांपासून आपण सातत्याने लढत असून अंतिम लढाई पार पडायची आहे. आता आपण गावागावातून तयारी करायची आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जायचं म्हणजे जायचं. 27 ऑगस्ट अंतरवली सोडायची. कुठेही न थांबता मुंबई गाठायची आहे. या वेळी जायचा मार्ग बदलायचा आहे. गेल्या वेळी पुणे जिल्ह्यातील सगळ्या जाती धर्मातील लोकांनी आपली सेवा केली असं ते म्हणाले. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली मधून 10 वाजता निघायचं ठरवण्यात आलं आहे.
मराठ्यांची लाट काय असते, हे मुंबईला आल्यावर बघा. इथून 10 ते 12 लाख लोक निघाले पाहिजे. काही पाऊस पाणी बघू नका असं ही जरांगेंनी सांगितलं. फक्त तुम्ही सर्व जण माझ्या मागे राहा. मी बघतोच की हे आरक्षण कसे देत नाहीत. 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करायची आहे. फक्त माझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा,1 इंच सुद्धा मागे हटणार नाही. मराठ्यांनी आता हुशार व्हा, आपल्या बाजूने विजयाची चाहूल लागली आहे. त्यामुळे घरी थांबायचं नाही. तुमच्या ताकदी शिवाय कोणालाही विजय मिळवता येत नाही. आतापासून मुंबईला जाण्याच्या तयारी लागा. घरोघरी जाऊन सांगा असं ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा ही दिला आहे. फडणवीस साहेब आम्ही 29 तारखेला येत आहोत. माझ्या मराठ्यांच्या मुलांना काठी लागली तर पाहा. महाराष्ट्रा मधल्या पांदन रस्त्याने फिरणं मुश्किल होईल. ग्रामीण रस्ते तर सोडूनच द्या असा इशारा त्यांनी दिला आहे. आता आमच्यात संयम राहिलेला नाही. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही.आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच घेणार, असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. 29 तारखेच्या आता मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या असंही त्यांनी सांगितलं.
मुंबईचा जाण्याचा मार्ग
- आंतरवली 27 ऑगस्ट निघाल्यानंतर
- शहागड
- पैठण
- शेवगाव
- पांढरीपूल
- अहिल्यानगर
- नेप्टी नाका मार्गे आळेफाटा
- शिवनेरी दर्शन
- माळशेज घाट
- कल्याण
- वाशी,चेंबूर
- मंत्रालय
पर्यायी मार्ग
- पैठण,गंगापूर,वैजापूर,येवला,नाशिक, मुंबई.