MNS vs BJP: वोट चोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ यावरून विरोधकांनी भाजपला चांगलेच घेरले आहे. एकीकडे निवडणूक आयोगाल लक्ष्य करताना दुसरीकडे भाजपवर निशाणा साधला जात आहे. राज ठाकरे यांनी तर मतदार याद्यांचा घोळ कसा आहे हे दाखवून दिले आहे. नावं कशी कमी केली जात आहेत. कशी वाढवली जात आहेत हे दाखवून दिलं. राज ठाकरे यांनी केलेली ही टीका मंत्री नितेश राणे यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी लागलीच मोहल्ल्यात जावून मतदार याद्या चेक करा असा सल्ला दिला. त्याचा चांगलाच समाचार मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतला आहे. शिवाय एक असं आव्हान दिलं आहे ज्यामुळे नितेश राणे यांची कोंडी झाली आहे.
निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर नितेश राणे यांना मिरच्या का झोंबतात असा सवाल जाधव यांनी केला आहे. काही प्रश्न उपस्थित केले की राणेंचे मोहल्ला मुस्लीम हेसुरू होतं. तुम्ही सत्तेत आहात मग तुम्ही जा आणि सर्व काही चेक करा. आम्हाला काय सांगता असं अविनाश जाधव म्हणाले. ज्या गोष्टी खऱ्या आहेत ते दाखवण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. पुढे ही करत राहाणार. मतदारांची संख्या अचानक कशी वाढली? ज्यावेळी एकीकडे मतदारांची संख्या वाढली असेल तर दुसरीकडे नक्कीच कमी झाली असेल असंही ते म्हणाले. निवडणूक आयोगावर बोलल्यावर नितेश राणे यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सत्तेचा काय घोळ आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मनसे नेत्यांना नितेश राणे यांनी मोहल्ल्यात जावून मतदार याद्या चेक करण्याचा सल्ला दिला. यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले जर दम असेल तर नितेश राणे यांनी कोणत्याही मशिदमध्ये जावून हनुमान चालिसा बोलून दाखवावी, असं आव्हानच अविनाश जाधव यांनी दिलं. त्यांनी तसे करून दाखवले की आम्ही पण मोहल्ल्यात जावून मतदार याद्या चेक करू असं ते म्हणाले. निवडणूक आयोगावर बोललो की मुसलमान आणि मशिदवर ते येतात. आम्हाला खऱ्या मतदार याद्या द्या. त्यानंतर जय पराजय होईल ते आम्ही सहन करू असं ही ते म्हणाले.
निवडणूक याद्यांमधला घोळ आम्ही समोर आणला. त्यावेळी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना ही चिमटे काढले. ठाण्याचा महापौर कोण होणार हे मनसे ठरवेल असं ते म्हणाले. संदीप देशपांडे यांनी आपल्याला लोकसभे वेळी नरेश म्हस्के यांचे प्रामाणिक पणे काम करा. म्हस्के आपला माणूस आहे असा निरोप दिला होता. त्यामुळे म्हस्के मोठ्या मताधिक्याने निवडून आले याची आठवण जाधव यांनी करून दिली. शिवाय देशपांडेंच पुढचा ठाण्याचा महापौर कोण होणार हे ठरवतील असं वक्तव्य ही त्यांनी केलं.