- मुंबईत महिला आरक्षण सुधारणा विधेयकाच्या विरोधात भाजपने वरळी येथून डो मोर्चा काढला होता
- मोर्च्यात सहभागी असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना एका स्थानिक महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले
- या महिलेनं मंत्र्यांना मुलाखतीसाठी रिकाम्या मैदानावर जाण्याचा सल्ला दिला
महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरून भाजप आता रस्त्यावर उतरलं आहे. काँग्रेस विरोधात पुकारलेल्या या लढ्याचा फटका मात्र भाजपलाच बसल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळालं. त्याचं झालं असं की मुंबईत भाजपने काँग्रेस विरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. हा मोर्चा वरळीच्या जांबोरी मैदानातून निघाला होता. तो वरळी डोम पर्यंत जाणार होता. मोर्च्याला बऱ्या पैकी गर्दी जमली होती. संध्याकाळच्या वेळेला हा मोर्चा निघाल्यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण झाली होती. या मोर्चात मंत्री गिरीष महाजन सहभागी झाले होते. ते प्रत्येकाला मुलाखत ही देत होते. त्यामुळे रस्ता पुर्ण पणे चोक झाला होता. याचा फटका तिथे राहणाऱ्या एका स्थानिक महिलेला बसला. त्यानंतर तिने मंत्र्यांसह पोलीसांना चांगलेच धारेवर धरले. यावादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबईत भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. महिला आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर न झाल्याने काँग्रेससह विरोधकांविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. पण यापेक्षा हा मोर्चा वाहतूक कोंडीमुळे जास्त चर्चेत आला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका महिलेनं या वाहतूक कोंडीवर आक्रमक होत वाद घातला. तुम्ही रस्त्यावर गर्दी का करत आहात? तुम्हाला वाहतूक कोंडी करण्याची परवानगी कोणी दिली? याचा लोकांना त्रास होत आहे. तुम्ही इथून तात्काळ चालते व्हा!, गेट आऊट असं ती मंत्र्यांनाच बोलू लागली. माझ्या मुलाला आणायला जाण्यासाठी उशीर होत आहे. मी एक तास तुमच्या मुळे अडकली आहे असी ती ओरडून सांगत होती.
अचानक झालेल्या या घडामोडीमुळे मंत्री गिरीष महाजन ही भांबावून गेले. त्यांनी ही समजदारी दाखवत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र महिलेचा राग काही शांत झाला नाही. तुम्हाला मुलाखती द्यायच्या आहेत तर रिकामं मैदान आहे. तिथे जा आणि मुलाखती द्या असं ती सांगत होती. तुमच्या मुळे वाहतूक कोंडी होत आहे. तुम्ही रस्ता तात्काळ खाली करा. ही महिला इंग्रजी आणि हिंदीतून भांडत होती. आपला राग आणि आक्रोश व्यक्त करत होती. तिने मंत्र्यानाच नाही तर पोलीसांना ही याचा जाब विचारला. याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया' आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे. आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world