आज भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्रनाम्याचं प्रकाशन केलं. यामध्येही मविआने महाराष्ट्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. यावेळी मविआच्या नेत्यांनीही भाजपविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या.
यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले, सातत्याने महाराष्ट्राला फसवण्याचं काम भाजप करत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे दुप्पट भाव देऊ, अशा घोषणा केल्या जात आहे. मात्र भाजपला शेतकरी आता आठवले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अद्यापही राज्यात तरुणांचा आणि रोजगारांचा प्रश्न निरुत्तरित आहे. या सगळ्याचा तोडगा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची हमी आम्ही दिली आहे. या अत्याचाराच्या सरकारला बाहेर काढण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असंही ते यावेळी म्हणाले. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. त्यामुळे देशासाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे, असं काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
नक्की वाचा - BJP Manifesto 2024 : अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?
मविआच्या महाराष्ट्रनामा जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा..
पंचसूत्री कार्यक्रम -
- प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन लाखांचा निधी
- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलेला प्रतिमाह 3 हजार रुपये
- महिलांसाठी मोफत बससेवा
- 3 लाखांपर्यंत कृषीकर्ज माफ, नियमित कर्जफेडणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत सूट
- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना 4 हजार रुपये स्टायपेंड
- आरोग्य विमा 25 लाखांपर्यंत आणि मोफत औषधे
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचा कर्ज माफ
- नियमित कर्ज देणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत मदत
- जातीगणना केली जाणार आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार
- 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा आणि मोफत औषधं
- बेरोजगारांसाठी 4 हजारांपर्यंत महिला निधी
- स्वयंपाकाचे सहा गॅस सिलिंडर प्रत्येकी पाचशे रुपयात उपलब्ध करून देणार
- महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार, तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
- 9 ते 16 वयोगटातील सर्व मुलींना गर्भमुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक लस मोफत देणार
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसात दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये दुपारी 12 वाजता प्रकाशित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड आणि पवार गटाचे जयंत पाटील उपस्थित होते.