- विधानभवनात नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांची अनपेक्षित भेट झाली
- नितेश राणेंच्या ऑफरमध्ये आदित्य ठाकऱ्यांनी हिंदुत्ववाद स्विकारावा असं सांगितलं आहे
- आदित्य ठाकरे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेतृत्व करत असून ते इंडिया आघाडीचे भाग आहेत
जुई जाधव
विधानभवनाच्या परिसरात राजकीय घडामोडी होत असतात. मात्र यावेळी एका अनपेक्षित भेटीने आणि त्यानंतर आलेल्या विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशी एक घटना आज विधान भवनात घडली. तसं पाहीलं तर मंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे अनेक वेळा एकमेकांसमोर आले आहेत. पण त्यांच्यात कधी संवाद झाला नाही. एकमेकांना कोपखळ्या मारणे इतपर्यंत या दोघांमधील आतापर्यंतचा संवाद. पण आजच्या एका घटनेनं राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. विधान भवनातील पोडियमजवळ शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नितेश राणे यांची भेट झाली. या भेटीनंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट 'युती'ची ऑफर देत खळबळ उडवून दिली आहे.
आदित्य ठाकरेंना दिलेल्या ऑफरबद्दल बोलताना नितेश राणे यांनी काही अटीही घातल्या आहेत. राणे म्हणाले की, "जर आदित्य ठाकरेंनी हिंदुत्ववादी विचार स्वीकारले. मशिदीवरील प्रेम कमी करून मंदिरांवर प्रेम करणे सुरू केले, तर आम्ही त्यांना आमच्या सोबत घेण्यास नक्कीच तयार आहोत." नितेश राणेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे सध्या 'इंडिया' आघाडीचा भाग आहेत. शिवाय ते शिवसेने ठाकरे गटाचे नेतृत्व ही करत आहेत. राणेंनी दिलेली ही ऑफर किती गांभिर्याने घ्यायची याचीही चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
नितेश राणेंच्या या विधानानंतर शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव म्हणाले, "नितेश राणे कोण आहेत? त्यांना कमी वयात मंत्रीपद मिळाले हे खरे आहे, पण त्यांची पार्श्वभूमी काय? हे नितेश राणे आधी काँग्रेसमध्ये होते. आता ज्या महायुतीत आहेत, तिथे अजित पवारांचे नेतेही आहेत. ज्यांच्यासोबत ते आता बसले आहेत, त्यांचे हिंदुत्व नेमके काय आहे? आधी स्वतःच्या हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करावी." असं सांगत त्यांनी राणे यांनाच आरसा दाखवला आहे. जाधव यांनी यावेळी भाजपच्या 'वॉशिंग मशीन' संस्कृतीवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. महायुतीतील वैचारिक विसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नितेश राणेंनी केलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला उत्तर देताना जाधवांनी त्यांच्या जुन्या काँग्रेसमधील प्रवासाची आठवण करून दिली.
विधान भवनातील या भेटीने आणि त्यानंतरच्या या वादाने महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. नितेश राणे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे सध्या शिवसेनेची धुरा सांभाळत असून त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत अधिक सर्वसमावेशकतेचा प्रयत्न केला आहे. नितेश राणेंची ही ऑफर गांभीर्याने घेतली जाण्यापेक्षा एक राजकीय 'टोक' म्हणून पाहिले जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष टोकाला असताना, अशा प्रकारची विधाने सातत्याने चर्चेत राहत आहेत.