- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला
- भारतीय संविधानानुसार मुख्यमंत्री सदस्य नसतानाही सहा महिन्यांपर्यंत पदावर राहू शकतो
- नितीश कुमार यांनी राजीनामा दिला तरी सहा महिन्यांच्या कालावधीत ते मुख्यमंत्री पद सांभाळू शकतात
Nitish Kumar Rajya Sabha: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणात एक मोठी घोषणा केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची माझी जुनी इच्छा होती, असे म्हणत त्यांनी राज्यसभेवर जाण्याचे संकेत दिले. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी आज गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होता. त्यामुळे नितीश हे दिल्लीच्या राजकारणता जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशा वेळी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पदावर नितीश कुमार यांना कायम राहाता येईल की राजीनामा द्यावा लागणार याची ही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत नियम काय सांगतो हे आपण पाहाणार आहोत.
भारतीय संविधानातील नियमा नुसार राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. तर अनुच्छेद 164 (4) मध्ये अशी तरतूद आहे की, एखादी व्यक्ती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतानाही 6 महिन्यांपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू शकते. या कालावधीत त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवणे अनिवार्य असते. नितीश कुमार यांनी आताच राजीनामा दिला, तरी ते कायदेशीररीत्या काही काळ पद सांभाळू शकतात. त्यामुळे ते राज्यसभेवर जरी गेले तरी पुढील सहा महिने ते मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारू शकतात.
सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले, "गेल्या दोन दशकांपासून तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. संसदीय कारकीर्द सुरू करतानाच माझी इच्छा होती की मी बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्य व्हावे. त्यानुसार मी यावेळेस राज्यसभा निवडणूक लढवू इच्छितो. आगामी नवीन सरकारला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल. असं म्हणत आपण आता दिल्लीच्या राजकारणात जात आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय नवीन नेतृत्वाखाली आता बिहारमध्ये सरकार येईल असं ही त्यांनी जाहीर केलं आहे. तो चेहरा कोण असेल हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
नियमांचा विचार केला तर, नितीश कुमार जरी आमदार किंवा विधान परिषद सदस्य राहिले नाहीत, तरी ते मुख्यमंत्री पदावर राहू शकतात. संविधानानुसार, कोणतीही व्यक्ती निवडणूक न लढवता किंवा सदस्य नसतानाही 6 महिने मंत्री किंवा मुख्यमंत्री राहू शकते. मात्र, राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्यावर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. सहसा अशा निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यावर काही दिवसांतच विधिमंडळ दलाची बैठक घेऊन नवीन नेत्याची निवड केली जाते. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी भावूक पोस्ट लिहित म्हटले की, "तुमच्या पाठिंब्यामुळेच मी बिहारची सेवा करू शकलो. बिहार आज विकासाच्या नव्या उंचीवर आहे. आता माझी इच्छा राज्यसभा सदस्य होण्याची आहे असं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world