
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. गोगोई म्हणाले की, सरकारने हे का सांगितले नाही की पहलगाम दहशतवादी हल्ला कसा झाला आणि दहशतवादी कसे घुसले? गोगोई म्हणाले की, सरकार 2016 मध्ये जी विधाने करत होती, तीच विधाने आता पुन्हा करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही अशीच विधाने करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर वर बोलताना गौरव गोगोईंनी विचारले की, राजनाथ सिंह म्हणाले की, "आमचा उद्देश युद्ध नव्हता, तर का नव्हता? आपण पाकव्याप्त काश्मीर (PoK) कधी घेणार?" असा प्रश्नही त्यांनी केला.
त्यासोबतच ते म्हटले की, उरी हल्ला हा सर्वात वेदनादायक हल्ला होता. उरी आणि पुलवामानंतर पहलगाममध्ये सर्वात भयानक हल्ला झाला आहे. "पाकिस्तानची इतकी हिंमत कशी झाली की तो वारंवार हल्ले करत आहे?" गौरव गोगोई म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला 100 दिवस उलटून गेले आहेत. परंतु हे सरकार दहशतवाद्यांना न्यायाच्या कचाट्यात आणू शकलेले नाही. तसेच ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागे लपू शकत नाही. असा थेट हल्लाबोल ही त्यांनी केला.
नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण
ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "शेवटी, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेतो? जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल (LG). जर कोणाला जबाबदारी घ्यायची असेल, तर ती केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) यांनी घ्यावी. केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागे लपू शकत नाहीत." असा टोला ही त्यांनी या चर्चेवेळी सरकारला लगावला. गोगोई पुढे म्हणाले, "सरकार इतके कमजोर आणि भित्रे आहे की त्यांनी म्हटले, 'टूर ऑपरेटर्स लोकांच्या परवानगीशिवाय किंवा परवान्याशिवाय त्यांना बैसरनला घेऊन जाण्यास जबाबदार आहेत.' पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाहून परतले, पण त्यांनी पहलगामला भेट दिली नाही. त्यांनी एका सरकारी कार्यक्रमात भाग घेतला आणि बिहारमध्ये एका राजकीय सभेला संबोधित केले. जर कुणी पहलगामला गेले असेल, तर ते आमचे नेते राहुल गांधी होते." असं ही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान यापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "कोणत्याही दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवले गेले" हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने आमच्या डीजीएमओंशी संपर्क साधला. कारवाई थांबवण्याची विनंती केली. ही ऑफर या अटीवर स्वीकारली गेली की, हे अभियान फक्त थांबवले जात आहे, जर भविष्यात पुन्हा काही दुस्साहस झाले, तर अभियान पुन्हा सुरू होईल, असं गोगई यांच्या आधी राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच संरक्षण मंत्री म्हणाले की, विरोधी पक्षाचे लोक विचारतात की, "किती विमाने पडली?" हे राष्ट्रीय भावनांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही, तर त्यांचा प्रश्न हा असायला हवा की, "दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले का?" असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world