- उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे
- या सहा खासदारांमध्ये वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहे
- संजय देशमुख यांनी यवतमाळ लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून निवडणूक जिंकली होती
साजन धाबे
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी फुट पडली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ पैकी सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गट पुढे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलिन केला जाणार आहे. यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या सहा फुटीर खासदारांमध्ये वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचा ही समावेश आहे. ते फुटणार ही बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांत संतापाचे वातावरण दिसत आहे. फुटीर खासदार संजय देशमुख यांना थेट सोशल मीडियावरून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.
जे सहा खासदार फुटले आहेत त्यात संजय देशमुख यांचा समावेश आहे. त्यांनी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा लाखभर मतांनी पराभव केला होता. मात्र तेच संजय देशमुख आता शिंदे गटात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख विजय शेंडगे यांनी सोशल मीडियावर त्यांना थेट धमकी दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाशिमचा खासदार संजय देशमुख फुटला तर त्याने पुन्हा वाशिममध्ये येऊ नये. अन्यत: त्याची गाडी पेटवून देऊ. जायचे असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशा आशयाची पोस्ट त्यांनी अपलोड केली आहे.
या पोस्टनंतर जिल्ह्यातील वातावरण आणखी तापले आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस ही अलर्टमोडवर दिसत आहेत. उप तालुका प्रमुख असलेल्या विजय शेंडगे यांनी सांगितलं की त्यांना एकच सांगणं आहे. त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. नंतर जिकडे जायचं आहे तिकडे जावं. त्यांना शिवसैनिकांनी निवडून आणलं आहे. शिवाय त्यांना शिंदेंच्या उमेदवारा विरोधात जनतेने निवडून दिलं आहे हे त्यांनी विसरू नये. त्यांनी जर का शिंदे सेनेत प्रवेश केला तर त्यांनी वाशिममध्ये येवू नयेत.
जर त्यानंतर तुम्ही वाशिममध्ये आलात तर तुमच्या गाडी सकट पेटवून देवू अशी धमकीच त्यांनी दिली आहे. शिवाय त्यांचे ऑफीसही आम्ही ठेवणार नाही असं ही ते म्हणाले आहेत. तुम्हाला शिवसैनिकांनी जिवाचं रान करून निवडून दिलं आहे. हे विसरलात का असा प्रश्न ही त्यांनी या निमित्तानं केला आहे. जर तुम्ही गद्दारी केली तर त्याची फळं तुम्हाला भोगावी लागती असं ही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वाशिम यवतमाळ मतदार संघातील वातावरण सध्या चांगलचं तापलेले दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world