स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काँग्रेसपासून दुर जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला आहे. त्यामुळे त्यांनी आता राज ठाकरे यांच्या बरोबर जाण्याची तयारी ही दर्शवली आहे. त्यात काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक झाली. त्यात मोठा निर्णय झाल्याचे समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत जायला नको असा सुर राज्यातल्या नेत्यांनी काढला होता. त्यासाठी काही मुद्देही मांडले गेले. महाविकास आघाडी झाली. त्यामुळे काँग्रेसचे मतदान हे शिवसेना ठाकरे गटाला मिळाले. पण ठाकरेंच्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केले नाही असा युक्तीवाद पक्षश्रेष्टीं समोर काही नेत्यांनी यावेळी केला. शिवाय उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे असं ही काहींनी या बैठकीत सांगितले.
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी जागा वाटपात घोळ घातला होता. शेवटच्या क्षणापर्यंत एका एका जागेवरून वाद सुरू होता. काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाकडून ब्लॅकमेल केलं जात होतं. अशी भावना काँग्रेस नेत्यांची होती. त्यांनी ती भावना पक्ष नेतृत्वा समोर बोलून दाखवली. शिवाय उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. मुंबईतील 3 जागा उद्धव ठाकरेंमुळे हातातून गेल्या. शिवाय राज्यभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती झाली. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत हे सर्व आरोप केले आहेत.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाने शिवसेने बरोबर जावू नये असा नेत्यांचा सुर होता. त्या पेक्षा स्वतंत्र निवडणूक लढवली जावी असं काहीचं म्हणणं होतं. काँग्रेसला मानणारा राज्यात मोठा मतदार आहे. शिवसेने बरोबर गेल्याने हा मतदार दुरावला आहे. त्यामुळे वेळत याबाबत निर्णय घेणे गरजेचे असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील पक्षनेतृत्व ठाकरें बरोबर जायचं की नाही याबाबत निर्णय काय घेतं याकडे लक्ष लागले आहे.