- बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रमुख नेत्यांसोबत बोलणी सुरू आहे
- अभिजीत बिचुकले यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
- आतापर्यंत बारामती पोटनिवडणुकीसाठी बारा उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत
देवा राखुंडे
बारामती पोटनिवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरू झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार पुढाकार घेत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रमुख पक्षाच्या नेत्यांसोबत बोलणी ही सुरू केली आहे. एकीकडे बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे. ज्या उमेदवाराने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते पाहात ही निवडणूक आता अटळ आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून अभिजीत बिचुकले आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचूकलेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत बारा उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता अटळ असल्याचं बोललं जात आहे. अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूका लढवल्या आहेत. ते निवडणूक लढण्याची एक ही संधी सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या सातार नगरपालिका निवडणुकीत ही त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही.
बिचुकले यांचा निवडणूक लढण्याचा इतिहास पाहाता ते उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत. त्यामुळे इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तरी बिचुकले हे मैदान सोडणार नाहीत अशी स्थिती आहे. या आधी ही त्यांनी उदयनराजे भोसले, आदित्य ठाकरे, यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. त्यात आता ते बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असं सांगितलं आहे. शिवाय ही निवडणूक का लढत आहे याबाबतची भूमीका स्पष्ट करण्यासाठी पुढील दोन दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बिचुकले दोन दिवसानंतर काय भूमीका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण बिचुकलेंच्या उमेदवारी मुळे बारामती पोट निवडणुकीत ट्वीस्ट नक्कीच निर्माण झाला आहे. त्यांनी उमेदवारी कायम ठेवली तर निवडणूक अटळ आहे.