देशभरात आज (15 मार्च 2025) कांशीराम यांची जयंती साजरी केली जात आहे. उत्तर प्रदेशात चार वेळा सरकार चालवणाऱ्या बहुजन समाज पार्टीची स्थापना कांशीराम यांनीच केली होती. पंजाबमध्ये जन्म झालेल्या कांशीराम दलितांचा मोठे नेते मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमत्त अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. 'दलित, वंचित आणि शोषितांच्या अधिकारांसाठी त्यांचा संघर्ष, सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये काँग्रेससाठी प्रत्येक पावलावर मार्गदर्शक असेल,' असं राहुल यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधी यांनी काय सांगितलं?
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया साईट 'एक्स' वर पोस्ट केलीय. 'महान समाजसुधारक आदरणीय कांशीराम यांना जयंतीनिमित्तानं सादर नमन. दलित, वंचित आणि शोषितांच्या अधिकारांसाठी त्यांचा संघर्ष, सामाजिक न्यायाच्या या लढाईमध्ये प्रत्येक पावलावर आम्हाला मार्गदर्शक असेल.'
कांशीराम यांच्या जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय अर्थ आहेत. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कांशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीवर भाजपाची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. बसपा 'इंडिया' आघाडीत सहभागी झाली असती तर मागील निवडणुकीत एनडीएला विजय मिळाला नसता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल यांच्या आरोपाला मायावती यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवर भाजपाची बी टीम म्हणून काम केल्याचा आरोप केला होता.
( नक्की वाचा : Rahul Gandhi : 'काँग्रेसमधील काही जण भाजपासाठी काम करतात', राहुल गांधींचा खळबळजनक आरोप )
कशी आहे काँग्रेसची अवस्था?
काँग्रेस पक्ष सध्या सर्वात वाईट कालखंडातून जात आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीपासून पक्षाला सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागत आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. झारखंडमध्ये पक्षाला दिलासा मिळाला होता. त्या राज्यात काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत सत्तेत आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या तीनच राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. सतत होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये सध्या आत्मचिंतन केले जात आहे.
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीनं गेल्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. काँग्रेसला या संकटातून बाहेर काढण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. ते सातत्यानं दलित, मागसवर्गीय तसंच आदिवासींच्या मुद्यांवर भर देत आहेत. याच व्होट बँकेला आकर्षित करण्यासाठी ते संविधान आणि आरक्षण धोक्यात असल्याचं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
( नक्की वाचा : Honey Trap : फेसबुकवरील मैत्रीची तार ISI पर्यंत पोहचली, पाकिस्तानला माहिती देणारा हेर अखेर सापडला! )
दलित मतांची 'माया'
उत्तर प्रदेशात बसपाची कामगिरी सातत्यानं खालावत आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचं वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष त्यांना आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यामध्ये आघाडीवर आहेत. राहुल गांधी संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. तर अखिलेश यादव पीडीएफ (पिछडा-दलित-अल्पसंख्याक) हा फॉर्म्युला घेऊन आहेत.
त्यांचा हा फॉर्म्युला मागील लोकसभा निवडणुकीत चालला होता. सपा-काँग्रेस आघाडीनं त्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 43 जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत सपाला 33 टक्के, काँग्रेसला 10 टक्के तर बसपालाही जवळपास 10 टक्के मतं मिळाली. तर भाजपाला 42 टक्के मतांसह 33 जागा मिळाल्या होत्या.
मागील लोकसभा निवडणूक सपा-काँग्रेस-बसपा यांनी एकत्र लढली असती तर भाजपाला मोठा हादरा बसला असता. त्यामुळेच दलित व्होट बँकेला आकर्षित करण्यासाठी दलित आयकॉनला आपलं करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. त्यामध्ये ते किती यशस्वी होतात, हे समजण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.