- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १५ मार्च रोजी निवडणूक होणार असून भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली
- माया ईवनाते यांना सरप्राईज उमेदवारी देऊन भाजपने आदिवासी समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व दिले आहे
- विनोद तावडे आणि रामदास आठवले यांना अउमेदवारी देण्यात आली आहे
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 15 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने आज आपल्या 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अपेक्षे प्रमाणे भाजपने धक्का तंत्र वापरले आहे. जुन्या नेत्या सोबत नव्या नेत्यांना ही संधी देण्यात आली आहे. हे करत असताना एक नाव सरप्राईज म्हणून पाहीलं जात आहे. ज्या नावाची साधी चर्चा ही नव्हती त्या नेत्याला थेट राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. ते नाव म्हणजे माया ईवनाते. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर माया ईवनाते कोण याची चर्चा सुरू झाली. शिवाय त्यांना उमेदवारी कशी मिळाली याबाबतही राजकीय वर्तूळात चर्चा आहे. दरम्यान अपेक्षे प्रमाणे विनोद तावडे आणि रामदास आठवले या अनुभवी नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे माया ईवनाते आणि रामराव वडकुते या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजपने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का दिला आहे.
धैर्यशील पाटील, प्रितम मुंडे, नवनीत राणा यांची नावे चर्चेत होती. पण या सर्वांना मागे टाकत माया ईवनाते यांनी बाजी मारली. माया ईवनाते या नागपूरच्या आहेत. शिवाय त्यांनी नागपूरचे महापौरपद ही भूषवले आहे. विशेष म्हणजे त्यांचे थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांत्या सोबत खास नातं आहे. ते म्हणजे राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या आहेत. तर माया ईवनाते या ही आदिवासी समाजातून येतात. माया ईवनाते यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष संघटनात्मक कामही केलं आहे. त्याचे फळ त्यांना यावेळी देण्यात आले. सध्या त्या नागपूर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पक्षासाठीचे काम आणि योगदान निष्ठा पाहून त्यांना पक्षाने थेट राज्यसभेसाठी संधी दिली आहे. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या समजल्या जातात.
माया ईवनाते यांना संधी देत भाजपने आदिवासी समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. यातून भाजपने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केल्याचे दिसून येतक आहे. सामाजित समतोल ही राखला गेला आहे विनोद तावडे यांचा वनवास संपला आहे. त्यांच्या माध्यमातून एक मराठी चेहरा देण्यात आला आहे.तर रामदास आठवले हे केंद्रात मंत्री आहे. त्यांनी संधी देणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दलीत प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. मराठा, दलित आणि आदिवासींना प्रतिनिधीत्व देत असताना चौथ्या जागेसाठी भाजपने धनगर समाजातील व्यक्तीला प्रतिनिधीत्व दिले आहे. या माध्यमातून रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना धनगर समाजाचा चेहरा समजला जातो.
रामराव वडकुते हे विधानपरिषदेचे माजी आमदार आहेत. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचा आश्वासक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. त्यांना उमेदवारी देवून राज्यसभेच्या उमेदवार यादीतून भाजपने सामाजिक समतोल राखल्याचं दिसून येत आहे. ही यादी पाहाता भाजपने आपलं धक्कातंत्र सुरू ठेवलं आहे. नवनीत राणा यांना संधी मिळेल असं बोललं जात होतं. पण महापालिका निवडणुकीत त्यांनी केलेल्या काही गोष्टी पक्ष नेतृत्वाला पटलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. त्यांच्या ऐवजी माया ईवनाते यांनी बाजी मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world