सुपारी आंदोलन! 'होय ते आमचेच शिवसैनिक पण...' संजय राऊतांनी हात का झटकले?

मनसे विरूद्ध शिवसेना यांच्या वाकयुद्ध रंगले. सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार अशी धमकीच मनसे नेत्यांनी दिली. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मनसे प्रमुख राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला समोरे जावे लागले. पण बीड इथं त्यांच्या विरोधात झालेलं सुपारी आंदोलनाची मनसैनिकांच्या जिव्हारी लागलं. त्याच्या प्रतिक्रीयाही उमटल्या. राज ठाकरे बीडमध्ये दाखल होतात, उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांच्या गाडी समोरच सुपाऱ्या उडवल्या. त्यानंतर जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर मनसे विरूद्ध शिवसेना यांच्या वाकयुद्ध रंगले. सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार अशी धमकीच मनसे नेत्यांनी दिली. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे शिवसैनिकच बुचकळ्यात पडले आहेत. 

'ते शिवसैनिक होते पण...'

बीडमध्ये शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या गाडी समोर सुपारी आंदोलन केले. आंदोलन करणारे शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात. पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं. आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषता मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं, त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे संजय राऊत म्हणाले.  त्याच बरोबर बीडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले. एकीकडे ते शिवसैनिक नव्हते असं संजय राऊत म्हणाले नाहीत. पण ते आंदोलन पक्षाचे नव्हते असे राऊत यांनी सांगित आंदोलनापासून आपले हात झटकले आहेत.  

Advertisement

मनसेचा इशारा, राऊतांचे उत्तर

राज ठाकरे यांच्या विरोधात सुपारी आंदोलन झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया मनसैनिकांत उमटल्या. सुरवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार असा इशारा मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला. त्यालाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. धमक्या आणि इशारे देऊ नका, त्या द्यायच्या असतील तर भाजपला द्या, फडणवीसांना द्या. महाराष्ट्र द्रोह्यांना द्या. जेव्हा राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपार्‍या टाकल्या, तेव्हा आम्ही दिल्लीत होतो असं राऊत म्हणाले.  लोकशाहीमध्ये सर्वांना निषेध करण्याचा अधिकार आहे.  महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वातावरण बिघडवलं जातंय, ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे असेही ते म्हणाले. 

Advertisement

मनसेने राऊतांना फटकारले 

'उबाठा' हे बाळासाहेबांचे विचार मांडणारे नाहीत. त्यांना हिजबूलचे विचार पटतात. हिजबूलही आधी हल्ला करतात नंतर हल्ला केला नाही असे म्हणतात. केलं तर हिंमत ठेवा. ज्यांना शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची जबाबदारी घेता येत नाही ते कसले शिवसैनिक असा प्रश्न संदिप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. अशा लोकांचे म्होरके संजय राऊत आहेत. अशा शब्दात मनसे नेते संदिर देशपांडे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला फटकारले आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या विरोधात झालेल्या सुपारी आंदोलना मागे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असल्याचा संशय मनसे नेते गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे. 

दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जातात का?

आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ज्याला सध्या बसवलेलं आहे ते लोटांगण घालूनच बसवलेले आहेत. आतापर्यंत गेल्या साठ वर्षांत सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील, तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालायला दिल्लीत गेल्याची टिका संजय राऊत यांनी दिली आहे.  दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे, याची आठवण यानिमित्ताने राऊत यांनी शिंदे गटाला करून दिली. 

Advertisement