मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड

Shivsena Leader on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळला नाही, अशी नाराजी शिवसेना नेत्यांनं व्यक्त केली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
A
मुंबई:

विधानसभा निवडणुकीला आता 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जोरदार खलबतं सुरु आहेत. जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या एका निर्णयावर शिवसेना नेत्यानंच थेट नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या राज्यपालांची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींकडून ही घोषणा होते. महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली आहे. राज्यपालांच्या याच नियुक्तीनंतर एनडीएमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराजी उघड झाली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचे पूत्र अभिजित अडसूळ (Abhijit Adsul) यांनी राज्यपालांच्या नियुक्तीनंतर भाजपाच्या विरोधात नाराजीचा सुर आळवलाय.  लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमरावती लोकसभा मतदारसंघ सोडून त्याबदल्यात अनंदराव अडसूळ यांना राज्यपालपद देणार अशा प्रकारे आश्वासन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. ते आश्वासन पूर्ण झालं नाही, अशी भावना अभिजीत यांनी व्यक्त केली आहे.

कोण आहेत आनंदराव अडसूळ?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये आनंदराव अडसूळ यांचा समावेश होतो. ते 1999 ते 2009 या कालावधीमध्ये बुलडाणा मतदारसंघाचे तर 2009 ते 2019 या कालावधीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळाही अडसूळ यांनी मंत्रिपद भूषवले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार )

अमरावती लोकसभेच्या 2019 साली झालेल्या निवडणुकीत अडसूळ यांचा नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पराभव केला. मागील लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढलेल्या नवनीत राणा यांनी यंदा भाजपामध्ये प्रवेश केला. महायुतीकडून अडसूळ निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण, त्यांना डावलून भाजपानं नवनीत राणा यांना उभं केलं. या निवडणुकीपूर्वीच अमित शहा यांनी वडिलांना राज्यपालपदाचं आश्वासन दिलं होतं, असा दावा अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.   

'आमचा विजय नक्की होता'

अमरावतीत आमचा विजय निश्चित होता मात्र आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम राहिलो असतो तर ते आमच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला असता.  आज आम्हाला अन्याय आणि अपमान झाल्याची भावना आहे. राजकीय काम थांबावावं वाटत आहे, अशी भावना अभिजीत अडसूळ यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केली. अमरावती लोकसभा मतदारसंघ जर आम्हाला दिला असता तर आता नक्कीच वेगळं चित्र दिसलं असतं, असा अभिजीत यांनी केला. 

Advertisement

( नक्की वाचा : 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल )

'फडणवीसांनी सांगूनही ऐकत नाहीत...'

मागील दोन वर्षांपासून मला मुंबै बँकेत स्विकृत सदस्य घेणार असं सांगितलं जातंय. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनही प्रवीण दरेकर ऐकत नाहीत, असा गौप्यस्फोट अभिजित अडसूळ यांनी यावेळी केला.