Chhaya Waghmare News : "पक्षाच्या वाढीसाठी तसेच कोणतेही सामाजिक कार्य न केलेल्यांना केडीएमसी निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले आणि अशा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकली जाते", अशी खंत शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. कल्याणमध्ये आयोजित बुद्धिस्ट वधू-वर परिचय मेळाव्यात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात त्यांनी आयोजकांचे कौतुक केले,मात्र आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका करत “आजच्या राजकारणात चोर आणि शायनर घुसले आहेत” असे विधान केले.यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वाघमारे यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत स्पष्ट भूमिका मांडली.
छाया वाघमारेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
“महापालिका निवडणुकांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जाते. उलट ज्यांचा समाजकार्याशी काहीही संबंध नाही,अशा लोकांना उमेदवारी दिली जाते,” असे त्या म्हणाल्या.तरी पक्षाच्या आदेशामुळे अशा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर येते,”अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.वाघमारे यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण येण्याची शक्यता असून पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे बोलले जात आहे.
नक्की वाचा >> Pune News: अक्षय तृतीयानिमित्त पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीला उसळी, 'या' ठिकाणी ग्राहकांच्या रांगाच रांगा
शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. छाया वाघमारे यांनी कोणाला लक्ष केले आहे? त्यांच्या रोख कोणावर आहे? छाया वाघमारे यांनी केलेला विधानाची दखल पक्षातील नेते घेणार का? असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.दरम्यान, शिवसेना शिंदे गटात या विधानामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे, अशी देखील चर्चा आहे.