बांगलादेशची क्रिकेट टीम दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी भारतामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही देशांमधील पहिली टेस्ट गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईत सुरु होत आहे. ही सीरिज सुुरु होण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, 'बांगलादेशची क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आहे. बांगलादेशमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून हिंदूंना हिंसाचार सहन करावा लागतोय, हे आम्हाला काही मीडिया आणि सोशल मीडियामधून समजलंय. हिंदू आणि अल्पसंख्यांकाना हिंसाचाराचा सामना करावा लागत असेल तर भाजपाच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकार आणि बीसीसीआय इतकी मवाळ का आहे? या दौऱ्याला परवानगी का दिली? हा प्रश्न मला परराष्ट्र मंत्रालयाला विचारायचा आहे.
( नक्की वाचा : 'त्यांना मजा करु दे...' रोहितनं पहिल्या टेस्टपूर्वी संपवला बांगलादेशाचा विषय )
तसं नसेल तर परराष्ट्र मंत्रालय बांगालेशमधील हिंसाचारावर सोशल मीडिया आणि मीडियामधील गोष्टींची सहमत आहे का? इथं ट्रोल बांगलादेशमधील हिंसाचाराचं निमित्त करुन भारतीयांमध्ये द्वेष पसरवत आहेत आणि बीसीसीआय क्रिकेटसाठी बांगलादेशचा यजमान बनलंय.
मला आश्चर्य वाटतंय, जी लोकं या हिंसाचाराच्या विरोधात सक्रीय अभियान चालवत आहेत. ते बीसीसीआयची चर्चा का करत नाहीत. त्यांना प्रश्न का विचारत नाहीत? हा फक्त भारतामध्ये द्वेष निर्माण करण्याचा आणि निवडणूक प्रचाराचा मुद्दा आहे का?