महापालिका निवडणुकीत ठाण्यात काय होणार, त्याचा आंदाज आतापासूनच येत आहे. तेच पारंपारिक राजकीय शत्रू पुन्हा आमने-सामने येणार आहेत. ते दोघे म्हणजे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक. वनमंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांची सिडको प्रदर्शनी केंद्रात बैठक घेतली. त्यावेळी नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातली 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतुरा सुरु आहे. या चौदा गावांवरुन गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. कोरोना काळात औषधं चोरली, पाणी चोरलं आणि भूखंड बिल्डरच्या घशात घातले असं म्हणत नाईकांनी शिंदेंविरोधात आरोपांची माळच लावलीय.
गणेश नाईक एकनाथ शिंदेंना टार्गेट करत असताना दुसरीकडे शिंदे गटानं मात्र गणेश नाईकांनी टाकलेला चेंडू खेळण्याऐवजी सोडून दिलाय. प्रवक्ते नरेश म्हस्के यावर म्हणाले, एखादा सत्यानाश झाला असेल तर त्यांच्या आमदार वेगळाच काही म्हणल्या आहेत. त्यांनी गणेश नाईक यांना दोष दिला आहे. मुंबईत कोणाची सत्ता होती. घरात बसून कोण काम करत होतं, हे आपल्याला माहिती आहे. आम्ही महायुतीचे प्रतिनिधी आहोत. आम्ही जास्त काय बोलणार नाही. असं म्हणत म्हस्के यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं आहे.
एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक सध्या महायुतीत एकत्र नांदत असले तरी दोघांमधून विस्तवही जात नाही. गणेश नाईक खरं तर पालघरचे पालकमंत्री आहेत. तरी त्यांनी एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात जनता दरबार सुरू केला होता. तर एकनाथ शिंदेंनीही गणेश नाईकांच्या नवी मुंबईत जनता दरबार घेतला. गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सत्कार स्वीकारण्यासाठी गणेश नाईक ठाण्याला गेले होते. एकनाथ शिंदेंचाच मतदारसंघ असलेल्या कोपरीमध्येच भाजपनं गणेश नाईकांचा सत्कार केला. एवढंच नव्हे तर ठाण्यात येत्या निवडणुकीत ओन्ली कमळ फुलवायचं, अशी घोषणा नाईकांनी केली होती. गणेश नाईकांनी याआधी ठाण्याचं पालकमंत्रिपद भूषवलंय, त्यामुळे नाईकांना ठाण्याचा कोपरा न कोपरा माहीत आहे.
Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड
एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाही त्यांच्या निर्णयांना गणेश नाईकांनी वारंवार विरोध केला. आमच्या शहराचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण ?' असा सवालही गणेश नाईकांनी जाहीर सभेतून शिंदेंना केला होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बैठका घ्यायलाही सुरुवात केलीय. एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईकांना ठाण्यात पाठवण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यात 18 आमदारांपैकी शिवसेनेचे 7 आमदार आहेत. तर भाजपचे 9 आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे 2 खासदार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार आहे. गणेश नाईकांना भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिलीय. त्याचबरोबर ठाण्यातल्या रवींद्र चव्हाणांना भाजपनं पक्षाचं कार्याध्यक्ष केलंय. शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला चाप लावण्याचं भाजपचं सध्याचं राजकारण पाहता, यंदा ठाणे महापालिकेची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार आहे.