- उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यापारावर जोरदार टीका केली
- त्यांनी राम मंदिराच्या दानपेटीत चोरी झाल्याचा आरोप करून हिंदू आणि हिंदुत्वाशी गद्दारी झाल्याचं म्हटलं
- उद्धव ठाकरे सध्या परभणी दौऱ्यावर आहेत
राम मंदिराचा धंदा केला आहे. रामाच्या नावाने दुकान मांडले आहे. मंदिर वही बनायें गे हे कशासाठी बोलत होते हे आता समजलं आहे. राम मंदिराच्या आडून जे धंदे सुरू आहेत हे घृणास्पद आहे असा थेट हल्लाबोल शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मंदिराच्या नावाने जे काही सुरू आहे ते हिंदू आणि हिंदूत्वाशी गद्दारी आहे असं ही त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्या आधी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत केले. त्यावेळी ते बोलत होते.
परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. इथं ते शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. परभणी हा नेहमीच शिवसेनेचा गड राहीला आहे. पण त्याला धक्काबसला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राम मंदिराच्या व्यवहारात होत असलेल्या अफरातफरीवर सडकून टिका केली आहे. शिवाय ही हिंदू आणि हिंदूत्वाशी गद्दारी असल्याचं त्यांनी सांगितलं.
रामजन्मभूमीवर प्रभू रामाचं मंदिर उभं राहवं ही हिंदूंची भावना होती. त्यासाठी मोठा संघर्ष झाला आहे. अनेकांचे बळी गेले आहेत. दंगली झाल्या आहेत. त्यानंतर हे मंदिर उभं राहीलं आहे. पण या लोकांनी राम मंदिराचा धंदा केला आहे. रामाचं मंदिर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. पण त्याच्यानावावरच धंदा केला जात आहे. दुकान मांडले आहे, हे सर्व घृणास्पद आहे. मंदिर वही बनायें गे हे का सांगितलं जात होतं हे आता समजत असल्याचं ही ते म्हणाले. रामाच्या दान पेटीतून जी चोरी झाली आहे ती हिंदू आणि हिंदूत्वाशी गद्दारी आहे असा आरोप ही ठाकरे यांनी केला.
यावेळी त्यांनी बंडखोर खासदार संजय जाधव यांचा चांगलाच समाचार घेतला. खासदारांकडे लक्ष दिलं असतं तर बऱ्याच भानगडी बाहेर आल्या असत्या असं ही ते म्हणाले. आता गद्दारीच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे. मिंदे सेनेचे गद्दार शिरोमणी मुंबईत आहेत. त्यांचे सर्व उमेदवार लोकांनी ठरवून पाडले पाहीजे. गद्दारीची किडी महाराष्ट्र पोखरत आहे. तिला वेळेत चिरडलं पाहीजे. नाहीतर देश राज्य वाचणार नाही असं ही ते यावेळी म्हणाले. मी इथ सभा घेण्यासाठी आलो नाही. तर इथल्या मतदारांची माफी मागण्यासाठी आलो आहे असं ठाकरे म्हणाले. इंथून जिंकलेल्यांना आतापर्यंत गद्दारी केली आहे. पण इथले मतदार नेहमीच शिवसेनेसोबत राहीले आहेत असा ठाकरे यांनी सांगितलं.